जिल्हाधिकार्यांकडे मागणी; “त्या” पोलिस कर्मचाऱ्यांची सुद्धा चौकशी करा…
ओरोस ता २२: पालघर जिल्हयात दोन साधु व त्यांच्या वाहनचालकाची जमावाने पोलीसांच्या समक्ष काठयांनी मारुन हत्या केली.या मॉब लिचिंगच्या घटनेचा आम्ही निषेध करतो.या घटनेला जबाबदार असलेल्या आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी.घटनास्थळी उपस्थितीत असताना व सांधुनी संरक्षणाची याचना केली असताना त्यांना वाचविण्याचा कोणताही प्रयत्न न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना या प्रकरणात आरोपी करुन त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या लेखी निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,सदर घटना १६ एप्रिल २०२० रोजी घडली. त्याची व्हिडिओ क्लिप १९ एप्रिल २०२० रोजी समाजमाध्यमातुन व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त झाला. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आवाज उठवला. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जाग आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या भयानक हत्याकांडाची सरकारी यंत्रणेकडून तातडीने माहिती मिळाली असेलच तथापि त्यांनी याबाबत चार दिवसांनी २० एप्रिल २०२० रोजी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातुन जाहिर प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्या राज्यात साधुंची हत्या झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने स्वत: या घटनेची राज्याला माहिती देवून संबंधीतावर कारवाई करणे अपेक्षित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वत: चौकशी करे पर्यंत आणि विरोधी पक्ष नेत्यांनी आवाज उठवेपर्यंत मुख्यमंत्र्यांना या बाबत जनतेशी बोलावेसे वाटले नाही हे योग्य नाही. याविषयी बोलतांना मुख्यत्र्यांनी यापूर्वी राज्यात मॉब लिचिगचे प्रकार घडले आहेत, सदर घटना गैरसमजातुन घडली आणि केंद्रशासित प्रदेशात साधूंना रोखले असते तर असे घडले नसते अशा सबबी सांगुन पोलिसांच्या साक्षीने झालेले हे हत्याकांड किरकोळीत काढण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवते अश्या प्रकारे या हत्याकांडावर पांघरुण घालण्याच्या प्रयत्न केला गेला हे योग्य नाही.राज्यात गेल्या नोव्हेंबरमध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर कायदा व सुव्यवस्था स्थिती ढासळली आहे. गेल्या काही दिवसात गंभीर घटना घडल्या आहेत. ठाण्यात एका तरुणाला एका मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन मारहाण करण्यात आली. हजारो कोटींच्या गैरव्यवहारात तपास यंत्रणांना हवा असलेल्या आरोपीला राज्याच्या गृहखात्याच्या वरिष्ठ
अधिकाऱ्यांकडून लॉकडाऊनच्या काळात सवलत देण्यासाठी पत्र देण्यात आले, लॉकडाऊनमुळे संचारबंदी असताना तसेच चौकाचौकात पोलीसांचा बंदोबस्त असतानाहि बांद्रा येथे हजारोंचा जमाव जमला आणि आता पालघर जिल्हयात पोलीसांच्या
साक्षीने साधुचे हत्याकांड झाले. मुख्यमंत्री यांनी या घटनांबद्दल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातुन हकालपट्टी करुन वरील घटनांची नि:पक्ष चौकशी करावी. ठाणे येथे झालेल्या तरुणाच्या मारहाणी प्रकरणी नि:पक्ष चौकशीसाठी संबंधित मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा नेते अतुल काळशेकर आणि प्रभाकर सावंत आदि उपस्थित होते.