मालवण येथील बॅ.नाथ पै सेवांगणकडून करण्यात आले होते आयोजन…
ओरोस,ता.२२: बॅ. नाथ पै सेवांगण मालवण आयोजित ‘महात्म्याची ओळख’ या ऑनलाईन स्पधेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.स्पर्धेत कणकवलीची अनन्या देसाई प्रथम, कट्टा येथील तन्वी म्हाडगुत द्वितीय व बागायत येथील तेजल ताम्हणकर व आचरेची प्राची चोपडेकर संयुक्त तृतीय आल्या आहेत.
कोरोना विषाणुच्या प्रतिबंधासाठी देशात लॉकडाऊन झाल्यानंतर बॅ. नाथ पै सेवांगणच्यावतीने ‘महात्म्याची ओळख’ या महात्मा गांधी यांच्या जीवनावरील प्रश्न मंच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दररोज दहा प्रश्न सलग दहा दिवस व्हाट्स अपच्या माध्यमातून सहभागी स्पर्धकांना विचारण्यात आले होते. ५ ते १४ एप्रिल या दिवशी रोज दुपारी ३ वाजता प्रश्नावली विचारली जायची. सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्पर्धकांना उत्तर देणे बंधनकारक होते. सिंधुदुर्ग जिल्हया सोबतच सोलापूर, बुलढाणा, बेळगाव, लातूर, कोल्हापुर, मुंबई येथील ७६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेतील विजेत्या १ ते १o क्रमांकाच्या २० स्पर्धकाना
पारितोषिक व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ज्या स्पर्धकांनी दररोजच्या मिळून दहा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला त्या स्पर्धकांना ऑनलाईन प्रशस्तिपत्र पाठवण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांचे बॅ नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष देवदत परुळेकर, कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, स्पर्धा प्रमुख किशोर शिरोडकर यांच्यावतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच स्पर्धेच्या निमित्ताने महात्मा गांधी या महामानवाची जीवनतत्वे नव्याने जाणून घेतल्याबद्दल सर्व स्पर्धक, त्यांचे कुटुंबीय या सर्वाना संस्थेने धन्यवाद व्यक्त केले आहे.
१०० पैकी ७४ प्रश्नांचीच आली उत्तरे
महात्मा गांधी यांच्या जीवन चरित्रावर एकूण १०० प्रश्न विचारण्यात आले होते. रोज १० प्रश्न दुपारी ३ वा. व्हाट्सअपच्या माध्यमातून विचारले जायचे. त्याचे उत्तर त्याच सांयकाळी ६ वाजता मिळणे बंधनकारक होते. या स्पर्धेत विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक यांच्यासह शिक्षक व विविध क्षेत्रातील हुशार व्यक्ती सहभागी होत्या. तसेच प्रश्न विचारल्यावर पुस्तके चाळुन उत्तर देण्यास ३ तासांचा अवधी होता. तरीही ७४ प्रश्नांचीच उत्तरे देता आली.
निकाल सविस्तर
प्रथम अनन्या देसाई, द्वितीय तन्वी म्हाडागुत, तृतीय तेजल ताम्हणकर, प्राची चोपडेकर, चतुर्थ यश तळगावकर, संतोष वैज, पाचवा पूर्वा कुमठेकर, सहावा सोहम लाड, येनगे भागवत, सातवा गौरी चव्हाण, लौकिक भोगले, आठवा संपदा भाट, मलिष्का लोहार व संयोगिता मुसळे, नववा नवनीत परब, रोहिणी मसुरकर, दहावा कैवल्य मिसाळ, साक्षी देसाई आणि गीता पालयेकर अशाप्रकारे एकूण २० स्पर्धकांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले आहेत.