पालकमंत्री यांचे हायवे प्राधिकरणाला निर्देश; बालोद्यानाचीही पाहणी
कणकवली, ता.२ : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणात बाधित झालेल्या कणकवलीतील कै. श्रीधर नाईक बालोद्यान, व शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नव्याने उभारण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी नॅशनल हायवे अथॉरिटीला दिले आहेत. आज पालकमंत्री उदय सामंत, व आमदार वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यां समवेत या दोन्ही ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
जर हायवे अथॉरिटीला याकामी निधी कमी पडल्यास कणकवली शहराचे वैभव जपण्यासाठी या कामांना प्रत्येकी ५० लाख रु निधी दिला जाणार असल्याचे श्री सामंत यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री उदय सामंत यांनी छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी निश्चित केलेल्या जमीनीचा प्रस्ताव देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. नॅशनल हायवेच्या नियमामध्ये बसून या पुतळ्याचे बांधकाम नॅशनल हायवे करणार असेल तर तशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. जर हे काम नॅशनल हायवेला शक्य झालं नाही तर कणकवलीच्या वैभवात भर पाडणाऱ्या कै. श्रीधर नाईक बालोद्यान व छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जेवढा खर्च लागेल तेवढा खर्च डीपीडीसी मधून करणार असल्याचे श्री सामंत यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, संजय पडते,मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे.पवार,पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता श्री.पाटील, नीलम पालव, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, कन्हैया पारकर, सुशांत नाईक, भूषण परुळेकर, भाई परब, सोमा गायकवाड , श्री. पारकर , दिलीप बिल्डकॉन ठेकेदार कंपनीचे श्री.गौतम,आदी उपस्थित होते.