भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…
मुंबई,ता.०५: परराज्यातील मजूर आणि कामगांराना त्यांच्या राज्यात परत पाठवत असतानाच आपल्या महाराष्ट्रातून मुंबई, पुणे सारख्या शहरामध्ये कामा निमित्त आलेल्यांवर मात्र अन्याय करीत आहोत. विदर्भ, कोकण, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा या पट्टयातील तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यातील श्रमिक, चाकरमान्यांना त्यांच्या मुळ गावी मोफत पाठवण्याची व्यवस्था करा, अशी विनंती भाजपा नेते आमदार अँड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
आमदार अँड. आशिष शेलार यांनी पत्रात म्हटले आहे की, आपण राज्य शासनातर्फे परराज्यातील मजूर व कामगारांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्याचे नियोजन करीत आहोत. त्यामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी गर्दी करून आरोग्याची काळजी घेतली जात नसल्याची बाब समोर आली आहे. त्याकडे वेळीच शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. ४ मे रोजी भाभा रुग्णालय येथे मजुरांनी केलेल्या गर्दीने आरोग्याचे नियम पाळण्यात आले नाहीत.
राज्यात जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्यामुळे राज्याअतंर्गत अनेक श्रमिक, कामगार अडकून पडले आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनांप्रमाणे आरोग्य तपासणी करून अशा श्रमिकांना तातडीने त्यांच्या मुळ गावी सोडल्यास त्यांची होणारी कुचंबणा व गैरसोय कमी होईल. यातील अनेक श्रमिक, मजूर हे जिल्ह्यांच्या सीमांवर अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या अन्न पाण्याच्या सुविधेसह आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.