जिल्हा प्रशासनाचा हीरवा कंदील;
सहा जणांची पहिली तुकडी सिंधुदुर्गात दाखल….
बांदा.ता.06ः लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गोव्यात अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना परत सिंधुदुर्गात आणण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी रीतसर प्रशासकीय परवानगी दिल्यानंतर आज दुपारी ६ जणांची पहिली तुकडी बांदा-पत्रादेवी तपासणी नाक्यावर दाखल झाली.
यावेळी सावंतवाडी नायब तहसीलदार प्रदिप पवार, बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव, बांदा वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील आदी उपस्थित होते. गोव्यातून जिल्ह्याच्या हद्दीत आल्यानंतर प्रथम आरोग्य विभागामार्फत सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य तपासणीत सर्वजण वैद्यकीयदृष्ट्या ठीक असल्याचे डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले. सर्वांना होम क्वारंटाइन करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्गातील २५४ नागरिक गोव्यात अडकून पडले आहेत. पैकी १०६ नागरिकांना जिल्ह्यात आणण्यास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंजुरी दिली आहे. गोवा सरकारनेही १०६ नागरिकांना परत पाठविण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार आज दुपारी ६ जणांची पहिली तुकडी बांदा चेकपोस्टवर दाखल झाली आहे. टप्पाटप्प्याने उर्वरित नागरिकांना आणण्यात येणार आहे. आरोग्य तपासणीत नॉर्मल असणार्यांना होम क्वारंटाइन करण्यात येणार आहे. सर्दी, खोकला, गळा खवखवणे यासारखी लक्षणे दिसल्यास संबंधितांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले.