मनसेकडुन प्रकार उघड; संबधितांवर गुन्हे दाखल करण्याची अधिकार्यांकडे मागणी…
सावंतवाडी ता.१२: तिलारी कालव्यातून विलवडे मार्गे ओटवणे पर्यत येणार्या पाण्याची अज्ञाताकडुन चोरी होत आहे.त्यामुळे कालवा होवून सुध्दा ओटवणे गाव तहानलेलेच आहे.हा प्रकार येथिल मनसेच्या पदाधिकार्यांनी उघड केला.ही चोरी तात्काळ रोखण्यात यावी तसेच संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा,अन्यथा आंदोलन केले जाईल,असा इशारा यावेळी देण्यात आला.दरम्यान येत्या दोन दिवसात ही समस्या दुर केली जाईल,असे आश्वासन तिलारीचे अधिकारी श्री.निपाणी यांनी दिले.
यावेळी शहरअध्यक्ष आशीष सुभेदार,संतोष भैरवरकर,विठ्ठल गावडे आदी उपस्थित होते.
याबाबत श्री.सुभेदार यांनी निपाणी यांच्याशी चर्चा केल्यानंतर याबाबतची माहीती दिली.ते म्हणाले, तिलारी धरणाचे पाणी ओटवणे पर्यत येण्यासाठी कालवा काढण्यात आलेला आहे.परंतू त्या ठीकाणी पाणी येण्यासाठी २२ मार्चला पाणी सोडण्यात आले परंतू अद्याप पर्यत हे पाणी ओटवणे पर्यत पोहोचलेलेच नाही.त्यामुळे ओटवणे गावात कालवा असून सुध्दा परिसरात पाणी टंचाई आहे.गावातील लोकांना टँकर बोेलविण्याची वेळ आली आहे.त्यामुळे नेमका प्रकार काय हे पाहण्याचा प्रयत्न केला,असता विलवडे परिसरातील काही लोक वॉल्व सोडून तसेच थेट नदीच्या पात्रात पंप टाकून पाणी चोरी करीत असल्याचे दिसून आले आहे.याबाबत अनेक वेळा अधिकार्यांचे लक्ष वेधून सुध्दा कोणीच दखल घेतलेली नाही.त्यामुळे आपण प्रसंगी आंदोलन करू,असा इशारा यावेळी उपस्थित पदाधिकार्यांनी दिला.दरम्यान आपण तुमच्या मागणीची तात्काळ दखल घेवू,तसेच येत्या दोन दिवसात हा प्रश्न सोडविला जाईल,असा विश्वास श्री.निपाणी यांनी व्यक्त केला.