राजन तेली ; ३२ कोटीच्या धरणाचा खर्च पोचला १ हजार ८४ कोटीवर…
कणकवली, ता.१३: अधिकारी आणि ठेकेदारांत साटेलोटे असल्याने तालुक्यातील नरडवे येथील धरण गेली 19 वर्षे रखडले आहे. तसेच या धरणाचा खर्च तब्बल 1 हजार 84 कोटींवर गेला आहे. त्यामुळे या धरण प्रकल्पाची संपूर्ण चौकशी व्हावी आणि दोषी अधिकारी-ठेकेदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी राज्यपालांसह मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज दिली.
श्री.तेली यांनी कणकवलीत पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, नरडवे धरण प्रकल्पामुळे कणकवली आणि कुडाळ तालुक्यातील 13 हजार 22 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. हे धरण पूर्ण होण्यासाठी येथील प्रकल्पग्रस्तांनी शासनाला वेळोवेळी सहकार्य केले. मात्र अधिकार्यांच्या कामचुकारपणामुळे तीन गावांतील प्रकल्पग्रस्तांचे अजूनही पुनर्वसन झालेले नाही. तर ठेकेदाराच्या वेळकाढूपणामुळे या 32 कोटींचा हा प्रकल्प आता 1 हजार 84 कोटींवर गेला आहे. आत्तापर्यंत या धरणावर 520 कोटींचा खर्च झाल आहे. मात्र झालेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. असाच दर्जा कायम राहिला तर रत्नागिरीतील तिवरे धरणाप्रमाणे येथेही दुर्घटना घडण्याची भीती आहे. त्यामुळे या धरणप्रकल्पाची संपूर्ण चौकशीची मागणी आम्ही राज्यपालांसह मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांकडे करणार असल्याचे श्री.तेली म्हणाले.