नितेश राणे ; अधिकारी-ठेकेदारांवर कारवाई व्हायला हवी…
कणकवली, ता.13 ः निकृष्ट काम करून हायवे ठेकेदाराने संपूर्ण कणकवलीची वाट लावली आहे. पहिल्याच पावसात उड्डाणपुलाच्या जोड रस्त्याची भिंत कोसळली. ही भिंत वाहनावर, नागरिकांवर कोसळली असती तर अनेकांना नाहक जीव गमवावा लागला असता अशी भीती व्यक्त करत आमदार नीतेश राणे यांनी आज हायवे ठेकेदाराच्या कामाबाबत तीव्र संताप व्यक्त केला. तसेच दोषी अधिकारी आणि हायवे ठेकेदारावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी देखील त्यांनी केली.
शहरातील उड्डाणपूल जोड रस्त्याची संरक्षक भिंत कोसळल्यानंतर आमदार नीतेश राणेंसह नगराध्यक्ष समीर नलावडे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, शिवसेना नेते संदेश पारकर आदींनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी आमदार नीतेश राणे यांनी हायवे ठेकेदाराच्या कामाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. गेल्यावर्षी आम्ही हायवेच्या कामाबाबत आंदोलन केले तेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल करून आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला. पण हायवे ठेकेदार हा लोकांच्या जिवाशी खेळतोय, त्यामुळे आम्ही जनतेसाठी पुन्हा पुन्हा आंदोलन करतच राहणार असल्याचा इशारा श्री.राणे यांनी दिला.



