मालवण व्यापारी संघ; राज्य शासनाकडे मागणी,तहसीलदारांना निवेदन…
मालवण ता.१४: कोरोनाच्या काळात झालेली उपासमार लक्षात घेता शासनाने सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील तीन महिन्यांची ३०० युनिट पर्यंतची वीज बिले माफ करावीत,अशी मागणी मालवण व्यापारी संघाच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.याबाबत त्यांनी मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांना निवेदन दिले.
यावेळी मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर,रवी तळाशीलकर, गणेश प्रभुलीकर, महेश अंधारी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन वाळके, प्रमोद ओरसकर, उमेश शिरोडकर, भाऊ सापळे, विजय केनवडेकर, कवटकर आदी उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्या प्रमाणे, कोरोना विषाणूच्या साथीने देशात पाय पसरायला सुरुवात केल्याचे लक्षात येताच २५ मार्चपासून देशभरात टाळेबंदी लागू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्याला आता १०० दिवस लोटले आहेत. या संपूर्ण काळात स्वस्त व काही प्रमाणात दिलेले मोफत धान्य वगळता केंद्र वा राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत जनतेला झालेली नाही. मोदी सरकारने जाहीर केलेल्या तथाकथित २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधून गरीबांच्या ताटातील कोरड्या भाकरीवर चमचाभर तेलही पडलेले नाही. महाराष्ट्र हे तुलनेने देशातील सर्वार्थाने पुढारलेले राज्य. आर्थिक दृष्ट्याही प्रगत आहे. पण, राज्य सरकारनेही एक पैशाची मदत जनतेला केलेली नाही.
या पार्श्वभूमीवर तीन महिने घरात बसून काढावे लागल्याने हातावर पोट असलेल्या आणि पगारावर अवलंबून असलेल्या सर्वांचीच दमछाक झाली आहे. लाॅकडाऊन काही अंशी उठले असले तरी अजूनही अनेकांची रोजीरोटी सुरू झालेली नाही. गाठीशी असलेला थोडाबहुत पैसाही संपत आला आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात उपासमारीची भीती डोकावू लागली आहे. किंबहुना, भाडे भरता आले नाही, वीज बील भरता येत नाही, म्हणून आत्महत्या केल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत.
एकीकडे ही स्थिती असतानाही महावितरण कंपनी, बेस्ट तसेच अदानी, टाटा पाॅवर या सारख्या खासगी वीज कंपन्यांनी मागील तीन ते चार महिन्यांची वीज देयके ग्राहकांना पाठविली असून ती भरण्यासाठी तगादा लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या बिलातील वाढीबद्दल आंणि वीजदर वाढीबद्दल लोकांच्या मनात नाराजी आहेच, पण रोजीरोटी सुरू नसताना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायला, असा प्रश्न असतानाच ही बिले भरण्याचा तगादा सुरू झाल्याने लोकांमध्ये अधिक असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दरमहा ३०० युनिटस पर्यंत वीज वापर असणारे राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील ३ महिन्यांची वीज देयके माफ करण्यात यावीत व त्यासाठी आवश्यक त्या रकमेची भरपाई राज्य सरकारने महावितरण वा संबंधित कंपनीस कोविड पॅकेज वा अनुदान स्वरूपात द्यावी अशी मागणी मालवण व्यापारी संघाने केली आहे.