राज्य शासनाकडे मागणी; वेंगुर्ले भाजपाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन..
वेंगुर्ले.ता,१७:
महाराष्ट्र शासनाने दिनांक ११ जुलै २०२० रोजी गणेशोत्सव मार्गदर्शक परिपत्रक जाहीर केले आहे, ते कोकणातील गणेश उस्तवाच्या परंपरेचा कोणताही विचार न करता काढलेले आहे. ज्या चाकरमान्यांच्या जिवावर शिवसेनेने मुंबई – ठाणे महानगरपालिका किंवा आत्ताची राज्यातील सत्ता मिळवली त्या चाकरमान्यांना आपल्या गावात गणेशोत्सवा साठी येताना ज्या जाचक अटी घातल्या त्या शिथील कराव्यात तसेच शेकडो वर्षे चालत आलेल्या कोकणी परंपरेचा अवमान करणारे जाचक परिपत्रक रद्द करावे यासाठी भाजपा वेंगुर्ले च्या वतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
शासनाच्या या परिपत्रकात घरगुती गणेशमुर्ती दोन फुटाची असावी असा दंडक घालण्यात आला आहे. वास्तविक कोकणात गणपतीच्या मुर्त्या ह्या किमान दोन ते तीन महिने अगोदरच तयार करायला दिलेल्या असतात. त्यामुळे शासकीय परिपत्रक दाखवत गणेशोत्सवास परवानगीसाठी अडवल्यास गणेश भक्तांच्या जनक्षोभाची व कायदा सुव्यवस्थेची परीस्थिती गंभीर होवु शकते.
तसेच परिपत्रकातील मुद्दा क्रमांक चार हा अगदीच असंबद्ध व गैरलागु आहे. कोकणातील गणपतीचे पुजन हे साधरणपणे दीड, पाच, सात, अकरा किंवा एकवीस दिवस केले जाते.यात हिंदू पुजन पध्दतीने रोज पुजा, आरती आदीसह विधीवत पुजन केले जाते. हे गणपती येत्या माघीपर्यंत किंवा पुढील भाद्रपदापर्यंत करुन तोपर्यंत विसर्जन टाळण्याचे आदेश म्हणजे हिंदू भावना आणि कोकणी रीतिरिवाजाची चेष्टा उडवीण्याचा प्रकार आहे. तसेच कोकणातील गणेश चतुर्थी उस्तवात शाडुच्या मातीच्या मुर्तीचे पुजन व विसर्जनाचे वेगळे धार्मिक महत्त्व आहे त्यामुळे धातु किंवा संगमरवर मुर्ती पुजनाचे आदेश योग्य नाहीत.
अशा गणेशभक्तांच्या धार्मिक भावना, सणांच्या परंपरा आणि कोकणी धार्मिक रीतिरिवाज याचा विचार करता अशा परिपत्रकाचा भाजपा निषेध करतो व सदर अन्यायकारक परिपत्रक रद्द करावे यासाठी भाजपा वेंगुर्ले च्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकारी सुशांत खांडेकर उपस्थित असल्याने त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रविणकुमार लोकरे उपस्थित होते.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगराध्यक्ष राजन गिरप, साईप्रसाद नाईक, माजी जि. प.सभापती प्रीतेश राऊळ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर, ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर, मच्छिमार नेते दादा केळुसकर व वसंत तांडेल, नगरसेविका श्रेया मयेकर, युवा मोर्चाचे संदीप पाटील, किसान मोर्चाचे बापु पंडित, ज्ञानेश्वर केळजी, गणेश गावडे, समीरभाई चिंदरकर, नितीश कुडतरकर, दादा तांडेल, शेखर कुडव, सोशल मिडीयाचे अमेय धुरी इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.