जिल्हाधिकार्यांकडे मागणी; तीन वर्षे उलटून गेली तरी भरती न झाल्याची खंत…
ओरोस ता १७:
गेल्या तीन वर्षांपासून पवित्र पोर्टल मार्फत चालु असलेली प्रलंबित शिक्षक भरतीची पुढील निवड यादी तात्काळ लावून आम्हा सर्व अभियोग्यता धारक बांधवांना न्याय द्यावा. कारण शासन पवित्र पोर्टल मार्फत २०१७ पासुन शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवित असुन ३ वर्ष उलटून गेली तरी ही भरती पुर्ण होऊ शकली नाही. आम्ही आमची गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यामुळे आमची शासनाला प्रलंबित शिक्षक भरतीची पुढील निवड यादी तात्काळ लावण्यात यावी, अशी आमची कळकळीची विनंती आहे, अशाप्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर यांना अभियोग्यता धारक शुभांगी लोकरे-खोत यांनी दिले आहे.
सध्या कोरोनाने आमच्या घरची आर्थिक परिस्थिति खराब झाली आहे. त्यामुळे आता आमची आर्थिक, सामाजिक व मानसिक स्थिती पुर्णतः ढासळलेली आहे. आणखी विषाची परीक्षा नको. अन्यथा आम्ही आत्महत्येचे सत्र सुरू करण्यास किंचितही मागे सरकणार नाहीत याची सरकारने नोंद घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रलंबित शिक्षक भरतीची पुढील निवड यादी तात्काळ जाहिर करावी किंवा आम्हा सर्व अभियोग्यता धारकांना ईच्छा मरणाची परवानगी द्यावी. कारण दोन दिवसांपुर्वी आमचा एक अभियोग्यता धारक बांधव पुढील यादीची वाट पाहत असतांना मानसिक त्रास असह्य झाला नसल्याने हृदयविकाराचा झटका येऊन निधन पावला आहे. त्यामुळे आमच्या भावनेचा विचार करुन शासनाने तात्काळ पुढील निवड यादी जाहिर करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
पुन्हा भरती प्रक्रिया राबविन्याची गरज नाही
आम्ही सर्व आपली गुणवत्ता सिद्ध करुन भरतीची वाट पाहणारे अभियोग्यताधारक बेरोजगार आहोत. मागील भरतीत १२ हजार पैकी ५ हजार ८०० उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. त्यामुळे यासाठी नवीन भरती प्रक्रिया राबविन्याची गरज नाही, असे सौ लोकरे-खोत यांनी आपल्या निवेदनात नमूद केले असून राज्यातील सर्व पात्र लाभार्थी अशाप्रकारे आप आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत आहेत. यामाध्यमातून राज्यातील डीएडबीएड बेरोजगार प्रलंबित भरतीसाठी ‘जवाब दो आक्रोश आंदोलन’ करीत आहेत, असेही त्या म्हणाल्या.