डॉ.राजेश नवांगुळ;१४ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीबाबत बदल नको…
सावंतवाडी ता.२६: जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्यानंतर गोंधळ उडू नये,यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने आकडेवारी जाहीर करताना संबधित कंटेन्मेंट झोन जाहीर करावे,अन्यथा अफवा पसरल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात,अशी मागणी सावंतवाडी मेडीकल असोशिएशनचे अध्यक्ष तथा रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.राजेश नवांगुळ यांनी केली.दरम्यान भारतीय वैदयकीय संशोधन परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आवाहनानुसार क्वारंटाईनचा कालावधी हा चौदा दिवसाचाच ठेवणे गरजेचे आहे.मात्र काही ठीकाणी तो कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यामुळे आम्ही डॉक्टर संघटनेचे पदाधिकारी नाराज आहोत.याबाबत सुध्दा प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी,असे त्यांनी सांगितले.
श्री.नवांगुळ यांनी याबाबत आपली प्रतिक्रीया दिली.ते म्हणाले सदयस्थितीत जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत आहेत.यावेळी अहवाल आल्यानंतर त्या रुग्णाची संख्या देताना जिल्हा आरोग्य प्रशासनाकडुन कंटेेन्मेट झोन तात्काळ जाहीर करणे गरजेचे आहे.जेणे करुन अफवा उठणार नाहीत,शहरात काल नेतर्डे येथे आढळलेल्या रुग्णाने सबनिसवाडा असा पत्ता टाकल्यामुळे नाहक खळबळ उडाली होती.त्यामुळे अनेकांना नाहक फटका सहन करावा लागला होता.त्यामुळे जिल्हा प्रशासननाने खबरदारी घ्यावी,असेही श्री.नवांगुळ यांनी म्हटले आहे.



