उपसरपंच कृष्णा उर्फ आबा खवणेकर यांनी वेधले जि. प.अध्यक्ष व प्रशासनाचे लक्ष
वेंगुर्ले.ता,२६:
कालवी तिठा ते कालवीबंदर समुद्र किनाऱ्यावर जाणाऱ्या रस्त्यावरील तळी- बोवलेवाडी येथील श्री देव दाडोबा मंदिरा जवळील संरक्षक भिंत अतिवृष्टीमुळे कोसळलेली आहे. तर समोरील रस्ताही वाहून जाऊन मोरीही खचलली आहे. त्यामुळे सदरचा रस्ता धोकादायक बनलेला आहे. त्याची वेळीच दुरूस्ती न झाल्यास कालवीबंदर वाडीचा संपर्क तुटण्याची शक्यता असल्याने त्या भागातील संरक्षक भिंत व पुल मंजूर करून हा रस्ता वाहतुकीस सुयोग्य करावा अशी मागणी केळूस ग्रामपंचायतीचे उपसरपंच कृष्णा उर्फ आबा खवणेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा समिधा नाईक व जिल्हाधिकारी तसेच प्रशासनाकडे लेखी निवेदना द्वारे केली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, सदर रस्ता हा कालवीवाडी तसेच समुद्र किनाऱ्याकडे जाणारा असुन या रस्त्यावर दुचाकी तीनचाकी, चारचाकी तसेच मोठ्या वाहनांची वर्दळ सुरू असते. बरेच नागरीक या रस्त्यावरून पायी ये जा करत असतात. तसेच काही दिवसा पूर्वी झालेल्या अतिवृष्टीत दाडोबा मंदिरा जवळील मोरी कोसळली आहे आणि समोरील रस्ताही वाहून गेला आहे. आगामी काळात तो संपूर्ण खचल्यास या परिसराचा व इतर वाडीचा वाहतुकीचा संपर्क तुटणार आहे. तसेच गोकुळाष्टमी,गणपती सारखे उत्सव पुढे येत असल्याने व हा रस्ता वाहतुकीसाठी व्यवस्थित राहावा यासाठी सदर संरक्षक भिंत बांधण्याची गरज असल्याची येथिल ग्रामस्थांची मागणी असून केळुस गावचे उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार आबा खवणेकर यांनी या गोष्टीकडे लक्ष घालत संबधित ठिकाणी संरक्षक भिंत व पुल बांधण्याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षा सौ समिधा नाईक यांचे भेटून लक्ष वेधले आहे. यावेळी तळीवाडी येथील ग्रामस्थ गोपाळ वेंगुर्लेकर हेही उपस्थित होते. हे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सिंधूदुर्ग, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग वेंगुर्ले, बांधकाम सभापती सिंधुदुर्ग यांना दिले आहे.