अमित परब ; मालवण तहसीलदारांकडे तक्रार…
मालवण, ता. २७ : विरण येथील रास्त दराच्या धान्य दुकानात कार्यरत असलेले सेल्समन विलास वंजारी यांची मालवण तहसीलदारांकडुन चौकशी सुरू आहे अशी माहिती तक्रारदार अमित परब यांनी दिली. त्याच्या विरोधात गेल्या सात ते आठ वर्षांत मोठ्या प्रमाणात धान्याचा काळा बाजार झाला असून जनतेची फसवणूक होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी आपण केली होती. त्यानुसार चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती श्री. परब यांनी दिली.
सेल्समन विलास पांजरी यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी लेखी तक्रार श्री. परब यांनी २८ मे रोजी तहसीलदारांकडे केली होती. यात पांजरी यांनी धान्य दुकानात विविध प्रकारे कार्डधारकांची फसवणूक व धान्य विक्रीत काळा बाजार केल्याचे काही ठोस पुरावे तक्रारी सोबत सादर केले आहेत. यामध्ये ऑफलाईन धान्य विक्री रजिस्टरला १२ अंकी नंबर एका व्यक्तीचे तर नाव दुसऱ्या व्यक्तीचे अशी अनेक उदाहरणे आहेत. जे कार्डधारक मयत होऊन अनेक वर्षे झाली तरी त्यांची शिधापत्रिका अद्याप चालू ठेऊन धान्य वितरण करण्यात आले. एकाच कुटुंबातील विभक्त नसतानाही दोन शिधापत्रिका असून दोन्ही शिधापत्रिका मध्ये समाविष्ट केलेली नावे सारखीच आहेत. मयत व गावात हजर नसलेल्या कार्डधारकांचे ऑफलाईन, ऑनलाइन धान्य वितरणाचा काळा बाजार करण्यात आला आहे.
ऑफलाईन धान्य विक्री रजिस्टर मध्ये कार्डधारकांच्या स्वाक्षऱ्या चुकीच्या आहेत. विरण विकास संस्थेकडे पगारी कर्मचारी म्हणून काम करत असलेला सेल्समन पांजरी यांनी काळा बाजार करत मोठ्या प्रमाणात मालमत्ता गोळा केली असून त्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. शिवाय स्वतःची व आपल्या इतर कुटुंबाची शिधापत्रिका अंत्योदय योजनेचे लाभार्थी म्हणून नोंद केली आहे. स्वतःच्या मर्जीने व आपल्या मर्जीतील लोकांना शासनाच्या योजनांचा लाभ दिला आहे. त्यामुळे गरजू व गरीब लोक शासनाच्या योजनांपासून वंचित राहिले आहेत. या सर्व तक्रारीसोबतचे ठोस पुरावे तहसीलदारांना सादर करण्यात आले असून याची योग्य ती चौकशी करून संबंधित सेल्समनवर कायदेशीर कारवाई होऊन अन्याय होत असलेल्या ग्राहकांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार तहसीलदारांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असल्याची माहिती श्री. परब यांनी दिली.