शिवप्रसाद देसाई ; वाईल्ड कोकणतर्फे वेबिनार…
सावंतवाडी, ता. ०२: कोकणात पर्यावरण राखायचे असेल तर, इथली पर्यावरणपुरक संस्कृती पुनर्जीवित करायला हवी. पर्यावरणाच्या समृध्दीतून रोजगाराचा मार्ग दाखवणारे मॉडेल उभे केल्यास हे सहज शक्य आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई यांनी मांडले. वन्यजीव सप्ताहानिमित्त १ ते ७ ऑक्टोबर पर्यंत येथील वाईल्ड कोकण या संस्थेच्यावतीने पर्यावरण जागृतीसाठी वेबिनारचे आयोजन केले आहे. याचे पहिले पुष्प गुंफताना श्री. देसाई कोकणातील पर्यावरण व लोकजीवन या विषयावर बोलत होते.
ते म्हणाले, “सिंधुदुर्गात ५५ टक्के भूभाग वृक्षाने आच्छादलेला असला, तरी येथेही पर्यावरणाची झपाट्याने हानी होत आहे. इथली जैवविविधता धोक्यात आली आहे. वृक्षतोड, एकाच प्रकारची लागवड आदी अनेक प्रश्न आहेत. सागरी तसेच नद्याचे आरोग्यही धोक्यात आहे. हे राखायचे असेल, तर कोकणची जुनी पर्यावरणपूरक संस्कृती पुनर्जीवित करायला हवी. ते म्हणाले, “कोकणात खासगी वनांचे क्षेत्र जास्त आहे. केवळ प्रबोधन करून पर्यावरण राखणे कठीण आहे. या ऐवजी या संपन्न पर्यावरणातून लोकांना रोजगाराचा मार्ग दिसला, तर हे सहज शक्य आहे.पर्यटन हा यावरचा उपाय आहे. पर्यावरण राखीव पर्यटनाचे मॉडेल उभे केल्यास हे शक्य आहे. कोकणातील विविधता लक्षात घेवून प्रत्येक भागाचे पोटॅल्शील निश्चित करायला हवे. त्याचे मार्केटींग केल्यास पर्यटन नक्की वाढेल. यासाठी सकारात्मक मानसिकताही तयार व्हायला हवी.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे सचिव डॉ. गणेश मर्गज यांनी केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. धीरेंद्र होळीकर यांच्यासह प्रा. सुभाष गोवेकर, सतीश लळीत, माजी नगराध्यक्ष पल्लवी केसरकर, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर,अभिमन्यू लोंढे, मयु पटेकर, काका भिसे, विद्धेश सापळे, सुषमा केणी, डॉ. मानसी चोरगे, डॉ. नागेश दप्तरदार, डॉ बाळकृष्ण गावडे, अर्जुन सावंत, हरिश्चंद्र पवार आदी ६४ जणांनी आॅनलाईन वेबीनार सहभाग घेतला होता. या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. येत्या ७ ऑक्टोबर पर्यंत विविध विषयावर तज्ज्ञ रात्री ८.३० ते ९.३० वाजता ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.