जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर ठीय्या; शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात वेधले लक्ष
ओरोस,ता.५:
आंतरजिल्हा बदली झालेल्या १०३ प्राथमिक शिक्षकांना वेळीच कार्यमुक्त न केल्यास त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या सेवा ज्येष्ठतेचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच या जिल्ह्यातील शिक्षकांच्या समायोजना साठीच्या जागाही अडून राहिल्या आहेत. या शिक्षकांना कार्य मुक्त केल्यास हे प्रश्न मार्गी लागणार असल्याकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीने लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हा परिषद प्रवेश द्वारासमोर धरणे आंदोलन छेडले.
शासनाच्या ऑनलाईन बदली धोरणानुसार २०१९ पर्यंत पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या अशा एकूण तीन टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०३ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. तरी त्यांना कार्य मुक्त करण्यात यावे.या शिक्षकांना वेळीच कार्यमुक्त न केल्यास ते ज्या जिल्ह्यात बदलीने जाणार आहेत त्या ठिकाणी त्यांच्या सेवाज्येष्ठता प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच या शिक्षकांना कार्यमुक्त केल्याने त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांवर जिल्ह्यातील शिक्षकांना सोयीची शाळा मिळून समायोजनाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.
त्यामुळे पहिल्या तीन टप्प्यात बदली झालेल्या १०३ आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, सचिव अरुण पवार, शकीला तडवी, सानिका बेले, सत्यभामा भडकवाड, संतोष परब, संतोष कोचरेकर, संजय जाधव, सखाराम झोरे, तानाजी शिंगाडे, कृष्णा कालकुंद्रिकर, विनेश जाधव, राकेश अहिरे, सचिन डोळस, तुकाराम खिल्लारे आदी उपस्थित होते.