नवाबाग-वेंगुर्ला येथील घटना; अधिक उपचारासाठी दवाखान्यात हलवले
वेंगुर्ला,ता.१०:
वेंगुर्ला नवाबाग येथील गोपाळ तांडेल यांना आज सकाळी समुद्र किनाऱ्यावर परतीच्या पावसाच्या वेळी जोरदार ढगांचा कडकडाट व विजेचा लखलखाट सुरू असतानाच विजेचा धक्का लागला. यात ते बेशुध्द पडले त्यांना तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले.
नवबाग समुद्रात मासेमारी करुन आज सकाळी तांडेल व अन्य मच्छिमार बांधव घरी जात होते. दरम्यान सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास नवाबाग येथील किनाऱ्यावर अचानक पाऊस आल्याने आधारासाठी गझिबो येथे उभे होते. त्याच वेळी विजांचा लखलखाट सुरू झाला आणि त्यांच्या बाजूने विजेचा लोळ गेल्याने ते खाली बेशुद्धावस्थेत पडले. तत्काळ त्यांना येथील मणचेकर रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे. त्यांच्यावर अधिक उपचार डॉक्टर प्रल्हाद मणचेकर करीत आहेत. घटनेचे वृत्त कळताच उभादांडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणपत केळुसकर यासह अन्य मच्छिमारांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली व त्यांची विचारपूस केली.