लोकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भिती ; ग्रामस्थ पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात…
सावंतवाडी ता.११: येथील नगर परिषदेकडून कारिवडे येथे उभारण्यात येणाऱ्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला तेथील ग्रामपंचायतीचा विरोध कायम असताना पालिकेकडून हा प्रकल्प सुरू करण्याबाबत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.मात्र संबंधित प्रकल्प कार्यान्वित झाल्यास परिसरातील तमाम जनतेचे आरोग्य धोक्यात येणार असल्याने संबंधित प्रकल्प पालिकेने कार्यान्वित केल्यास पालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन व वेळ पडल्यास आमरण उपोषण करू,असा इशारा सरपंच अपर्णा तळवणेकर यांच्यासहित ग्रामस्थांनी दिला आहे.
कारिवडे येथील सर्वे नंबर १२४ (ब) हिस्सा न १ या पाच एकर जागेत घनकचरा टाकणे व कुंपण भिंत घालण्याचे काम पालिकेकडून सुरु आहे.संबंधित प्रकल्पाला याआधीच २०१७ रोजी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी विरोध दर्शवत ग्रामस्थांसह येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडले होते.यावेळी उपोषणकर्त्यांना प्रांताधिकारी यांनी आश्वासन देताना सावंतवाडी नगर परिषदेने उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व कारिवडे ग्रामस्थांसह संबंधित जागेची पाहणी करून निर्णय घेण्याचे ठरले होते.मात्र सद्यस्थितीत पालिका प्रशासन संबंधित प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याच्या प्रक्रियेत असल्याने या प्रकल्पाविरोधात पुन्हा एकदा कारिवडे ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी आवाज उठवला असून ग्रामस्थांच्यासह विरोध दर्शविणारे पत्र पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना दिले आहे.