तब्बल तीन वेळा हमीपत्र देऊनही लाभ न मिळाल्याने शेतकरी आक्रमक…
बांदा ता.१३: गतवर्षी ऑगस्ट व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस गावातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.भरपाई मिळणार या आशेने शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या पायऱ्याही झिझवल्या परंतु हमीपत्राचे कारण पुढे करत प्रशासनाने बाजू मारून नेण्याचे काम केले.तरीही एक नव्हे, दोन नव्हे तब्बल तीन वेळा हमीपत्रे देऊनही नुकसान भरपाई जमा न झाल्याने वंचित शेतकरी आक्रमक झाले आहेत.
पाडलोस गावातील सुमारे ११४ शेतकऱ्यांच्या भातपीक व फळपीकांचे ३ लाख ८९ हजार २८० रुपयांचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई मिळणार असे सांगत प्रशासनाकडून केवळ कादगपत्रांचा खेळ सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भरपाईसाठी शेतकऱ्यांनी अनेकवेळा तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिझवल्या. परंतु काही शेतकरी सोडले तर बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एक रुपया देखील जमा झाला नसल्याचे भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.
ऑगस्ट-ऑक्टोबर २०१९ मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे कापणी योग्य झालेले भातपीक जमीनदोस्त झाले होते. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून कृषी व महसूल विभागाने त्यावेळीच पिकांचे पंचनामे देखील केले. मात्र, एक वर्षाचा कालावधी पूर्णत्वास आला तरी सुद्धा काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. तीन वेळा हमीपत्र घेऊनही अद्याप भरपाई मिळाली नसल्यामुळे प्रशासनाने भरपाईचे आमिष दाखवून आम्हा शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचे, पाडलोस ग्रा. पं. माजी सदस्य तथा शेतकरी नंदा गावडे यांनी सांगितले.