गुरे घेवून घरी परतत असताना घडली घटना
कणकवली, ता.१४ :
काल मंगळवारी दुपार पासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक ओहोळाला पूर आल्याने कोंडये तेलीवाडी येथील मयुरी मंगेश तेली (35 ) ही महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली.रात्री उशिरा पर्यंत शोध घेवुन ही ती सापडली नव्हती ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी राबवलेल्या शोध मोहिमेत तिचा मृतदेह वाहून गेलेल्या ठिकाणापासून सुमारे दोन किलोमीटरवर आढळून आला.घटनेची माहिती समजताच तहसीलदार आर जे पवार यांनी बुधवारी घटनेस्थळी धाव घेतली.
मयुरी या आपल्या मुलीला सोबत घेवून गुरे चारन्यासाठी गेल्या होत्या.सायंकाळी घरी परतत असताना घरा नजीकच असलेल्या ओहोळाला अचानक पाणी आल्याने त्या वाहून जावू लागल्या यावेळी सोबत असलेल्या त्याच्या मुलीने आरडा ओरड केली.मात्र पाण्याला वेग जास्त असल्यामुळे मयुरी या वाहून गेल्या. ही बाब ग्रामस्थांना समजल्यावर ग्रामस्थांनी रात्री पर्यंत त्या ओहोळाच्या परिसरात शोध मोहीम राबवली.मात्र मुसळधार पावसामुळे शोध मोहिमेला यश आले नाही.
दरम्यान सकाळी पुन्हा शोध मोहिम सुरू करण्यात आली. घटना स्थळापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर मृतदेह झाडीत अडकलेल्या स्थितीत आढळून आला.घटनेची माहिती मिळताच बुधवारी सकाळी तहसीलदार आर जे पवार,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष डॉ.प्रथमेश सावंत, पत्रकार गणेश जेठे,लिपिक महादेव बाबर,तलाठी मारुती सलाम, मंडळ अधिकारी नीलिमा प्रभूदेसाई,उमेश मेस्त्री व ग्रामस्थ उपस्थित होते.मयुरी यांच्या पाश्चत पती,मुलगी असा परिवार आहे.घटनास्थळी जात पोलीसांनी पंचनामा केला.