नाना पटोले; विधान भवनात घेतलेल्या बैठकीत अध्यक्षांच्या सूचना…
मुंबई ता.१६: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-आंब्रड येथील २०१६ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या धरणाचे काम तातडीने पूर्ण करण्यासंदर्भातचा आढावा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आजच्या विधानभवन येथील दालनात घेतला.येत्या उन्हाळ्यापर्यत प्रकल्पाचे काम पूर्ण करा, शासनाने यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करावी,अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
आमदार वैभव नाईक यांनी मौजे आंब्रड, ता. कुडाळ जि. सिंधूदुर्ग येथील 2016 मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या धरणाचे काम पूर्ण करण्याबाबत निवेदन सादर केले होते, त्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी वरिल सूचना दिल्या
यावेळी मुख्य अभियंता सु. पां. कुशिरे, मृद व जलसंधारणचे उप सचिव वि. म. देवराज, अधिक्षक अभियंता, ठाणे सु. स. खांडेकर, कार्यकारी अभियंता य. ल. थोरात व इतर अधिकारी व प्रकल्पबाधित शेतकरी एकनाथ दळवी, विलास दळवी, संतोष दळवी उपस्थित होते.
सदर धरणाचे काम पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांचा सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यास मदत होणार आहे. या बैठकीत सुरु असलेल्या विहिरींच्या कामाबाबत चर्चा करण्यात आली. अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्यास याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे पाठवून प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी दिले.या गावचे सुपुत्र संजय दळवी हे काम पूर्ण होण्यासाठी सतत धडपडत आहेत.