अर्चना फाउंडेशन आणि अजब प्रकाशन यांचे आयोजन…
सावंतवाडी ता.१७: वाचन संस्कृती जोपासली जावी,वाढावी,नवीन पिढीला वाचनाची गोडी निर्माण व्हावी,त्यांच्या ज्ञानात जास्तीतजास्त भर पडावी या उद्देशाने अर्चना घारे – परब संचलित अर्चना फाउंडेशन आणि अजब प्रकाशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी,वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तीन ठिकाणी पुस्तक प्रदर्शन व अल्प दरात विक्री असा उपक्रम राबविन्याचा निर्णय घेण्यात आला आहे.विशेष म्हणजे सामाजिक उपक्रम म्हणून हे प्रदर्शन चालवले जाणार असून शंभर ते सहाशे रुपये किमतीपर्यंतचे पुस्तक फक्त सत्तर रुपये किमती मध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती अर्चना फाऊंडेशनच्या प्रमुख सौ. अर्चना घारे – परब यांनी दिली.त्या म्हणाल्या अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून सावंतवाडी,दोडामार्ग, वेंगुर्ला या ठिकाणी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. यापूर्वी आरोग्य तपासणी तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते.मात्र आता त्याला काहीसा फाटा फोडून पुस्तक प्रदर्शन व अल्प दरात विक्री असा अनोखा प्रयोग राबवित आहोत.या उपक्रमाची सुरुवात सावंतवाडी शहरातून करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उदघाटन दिनांक १९ मे रोजी सायं.५:३० वाजता येथील मेजर जगन्नाथराव भोसले उद्यान,सावंतवाडी येथे सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत खेम सावंत – भोसले आणि राणीसाहेब सौ. शुभदादेवी खेम सावंत – भोसले यांच्या शुभहस्ते होणार आहे.तर पुढिल आठ दिवस हे प्रदर्शन वाचकांसाठी सकाळी ९:०० ते रात्री ९:०० या वेळात खुले रहाणार आहे.यावेळी जास्तीत जास्त पुस्तके लोकांपर्यंत पोहोचावीत हे उद्दिष्ट ठेवण्यात आला आहे.त्याचा फायदा वाचक युवापिढीला व्हावा या उद्देशाने अनेक उत्तमोत्तम पुस्तके याठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे या संधीचा फायदा जास्तीत जास्त लोकाणी घ्यावा असे आवाहन सौ. अर्चना घारे परब यांनी केले आहे.