बाबू सावंतांचा आरोप; पुन्हा प्रकार घडल्यास गप्प बसणार नाही…
सावंतवाडी ता.०७: माजगाव येथील नळपाणी योजनेत दिड कोटीचा अपहार झाला आहे. मात्र हा प्रकार लपवण्यासाठी एक अधिकारी मला भेटण्यासाठी आला होता.’सेटिंग’चा प्रयत्न केला परंतु असा प्रकार पुन्हा झाल्यास आपण खपवून घेणार नाही,असा इशारा पंचायत समितीच्या सभेत सदस्य बाबू सावंत यांनी आज येथे दिला आहे.
कारीवडे येथे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.त्यामुळे या कामाची चौकशी करण्यात यावी तसेच संबंधित ठेकेदाराला काळया यादीत टाकण्यात यावे,अशी मागणी यावेळी सदस्यांनी केली.पावसाळा आला तरी रस्त्याचे काम होत नाही,ही शोकांतिका आहे.असे सदस्य मनीषा गोवेकर यांनी सांगितले.तर तालुक्यात सात-सात वर्ष विंधन विहिरी बंद आहेत.त्या दुरुस्त किंवा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न अधिकारी किंवा ग्रामपंचायतीकडून होत नाही,त्यामुळे पाणीटंचाईला जबाबदार कोण असा प्रश्न यावेळी उपस्थित सदस्यांनी व्यक्त केला.
ही सभा सभापती पंकज पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी उपसभापती संदीप नेमळेकर,गटविकास अधिकारी गजानन भोसले आदी उपस्थित होते.