रमेश बोंद्रे; ठेका न दिल्याचा राग काढण्यासाठी निवडणूक लावली
सावंतवाडी, ता. ०७ : एज्युकेशन सोसायटीच्या निवडणूक रिंगणात असलेल्या माजी विद्यार्थी संघाने आज जरी शाळेची भलावण करण्याचा प्रयत्न केला असला तरी गेली चार वर्षे शाळेची बदनामी केली. त्यामुळेच विद्यार्थी संख्या घटली, असा आरोप आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उत्कर्ष पॅनलचे प्रमुख रमेश बोंद्रे यांनी केला.
शाळेवर पत्रे घालायचे कंत्राट न मिळाल्यामुळे विरोधी पॅनलमध्ये असलेले काही लोक शाळेवर राग काढत आहेत. त्यामुळे त्यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र आम्ही प्रत्येक पॅनलचे तीन उमेदवार घेऊन निवडणूक बिनविरोध करा असा प्रस्ताव ठेवला होता. तो त्यांनी मान्य केले नाही, असेही बोंद्रे यांनी सांगितले.
उत्कर्ष पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोंद्रे म्हणाले, शाळेचे हित जपण्यासाठी गेले अनेक वर्ष आम्ही प्रयत्न करत आहोत. इंग्लिश शिकवणाऱ्या शाळांची संख्या व पालकांची आवड याचा फटका आमच्या शाळेच्या पटसंख्येला बसला ही वस्तुस्थिती आहे. त्याचे कारण पुढे करून विरोधी असलेले माजी विद्यार्थ्यांचे पॅनल याचे भांडवल करीत आहेत. हा सर्व प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे काही झाले तरी आमच्या नवीन जागा निश्चितच निवडून येतील, असा विश्वास बोंद्रे यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, आपण निवडणूक लढवणार नव्हतो. परंतु माहीती असलेले सदस्य पाहीजेत अशी काहींनी अपेक्षा व्यक्त केल्यामुळे आपण व शशी नेवगी निवडणुकीसाठी उभे राहीलो तर राजन पोकळे यांनी माघार घेतली.
यावेळी राजेंद्र डोंगरे, गुरुनाथ कदम, सतीश कामत, आनंद नेवगी, शशिकांत नेवगी, संजू शिरोडकर, मृणालिनी कशाळीकर, साक्षी वंजारी, समीर वंजारी आदी उपस्थित होते.