परशुराम उपरकर यांचा आरोप : पालकमंंत्र्यांमार्फत दबावाचा प्रयत्न
कणकवली, ता.8 : सिंधुदुर्गचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर यांंनी विनंती बदली मागितली. त्यानुसार त्यांची परभणी येथे बदली झाली. तर बालरोग तज्ज्ञ डॉ.देशमुख सिंधुदुर्गात हजर झाल्या आणि तातडीने रूग्णसेवा देखील सुरू केली. मात्र डॉ.चाकुरकर हे अजूनही आपल्या खुर्चीला चिकटून राहिले आहेत असा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज केला.
श्री.उपरकर यांनी येथील मनसे कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, पूर्वीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चाकुरकर यांची कार्यपद्धती वादग्रस्त राहिली आहे. त्यांनी मागितल्यानुसार त्यांची रीतसर विनंती बदली झाली. मात्र त्यांना सिंधुदुर्गात अधिक इंटरेस्ट असल्याने ते पालकमंत्र्यांमार्फत आपली बदली थांबविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. एवढेच नव्हे तर बदली होऊनही त्यांनी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे ठिय्या मांडला आहे.
श्री.उपरकर म्हणाले, सिंधुदुर्गात डॉक्टरांची रिक्तपदे असल्याने रूग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. जिल्ह्यात डॉ.देशमुख यांची जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून बदली झाली. त्यांनी लागलीच आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतला आणि रूग्णसेवा देखील सुरू केली. मात्र त्या कार्यभार घेत असताना डॉ.चाकुरकर यांनी अडवणुकीचा प्रकार केला. ते फार्मासिस्ट कार्यालयात बसून राहिले. तसेच आपली बदली रद्द होण्यासाठी त्यांनी पालकमंत्र्यांचे पत्र देखील घेतले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दरम्यान बालरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ.देशमुख खमक्या निघाल्याने डॉ.चाकुरकर यांची डाळ शिजलेली नाही. परंतु ते अजूनही पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपली बदली थांबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा सिंधुदुर्गात थांबण्याचा एवढा अट्टहास का? तसेच सिंधुदुर्गात तज्ज्ञ बालरोगतज्ज्ञ डॉक्टर मिळाले असताना डॉ.चाकुरकर आणि पालकमंत्री त्यात खोडा का घालत आहेत असाही प्रश्न श्री.उपरकर यांनी उपस्थित केला आहे.