परशुराम उपरकर; ठेकेदाराच्या दर्जाहीन कामामुळे सर्वसामान्यांच्या जीव धोक्यात
कणकवली ता.२१: गडनदीलगतच्या रस्त्याला भगदाड पडले यामागे हायवे ठेकेदाराची प्रचंड बेफिकिरी आणि कामाचा निकृष्ट दर्जा आहे. यापूर्वीही महामार्गाला तडे गेल्याचे, रस्ता खचल्याचे प्रकार झाले आहेत. याविरोधात सत्ताधारी लोकप्रतिनिधी अजिबात आवाज उठवत नाहीत. तर प्रशासकीय यंत्रणा देखील ठेकेदारापुढे हतबल झाली आहे. हायवेच्या या निकृष्ट कामाबाबत आम्ही आता न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली.
येथील मनसे कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, सिंधुदुर्गातील दोन्ही हायवे ठेकेदारांनी रस्त्यांची, पुलांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची केली आहेत. रस्ते सुरक्षा आणि गुणवत्ता तपासणी या यंत्रणेचे अधिकारी देखील सिंधुदुर्गात फिरकलेले नाहीत. चौपदरीकरणाचा ठेका घेतलेली एजन्सी मोठी असल्याने या ठेकेदाराने आमदार, खासदारांनाही जुमानलेले नाही. हायवेचे अधिकारी तर ठेकेदाराचे नोकर असल्यासारखे वागत आहेत.
ते म्हणाले, रस्ता आणि पुलांच्या भरावाची कामे करताना पाणी मारून माती खाली बसवणे आवश्यक होते. तसेच भरावासाठी चांगल्या दर्जाची माती वापरणे आवश्यक होते. मात्र हायवेची कामे करताना कोणतीही काळजी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे महामार्गालगत ठिकठिकाणी तडे जात आहेत. रस्ता खचला जात आहे. तर सर्वसामान्यांचा जीवच धोक्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयात जाऊन दाद मागण्याखेरीज पर्याय राहिलेला नाही.
- पालकमंत्र्यांमुळे स्त्रीरोगतज्ज्ञ माघारी
सिंधुदुर्ग शल्यकित्सकांनी बदली झाली होती. त्यांच्या जागी कोल्हापूर येथून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.शुभांगी देशमुख हजर झाल्या होत्या आणि लगेच कामाला सुरवात करत रुग्णांची तपासणीही सुरू केली होती. मात्र पालकमंत्र्यांनी आपल्या या स्त्रीरोगतज्ज्ञांना माघारी पाठवले तर भ्रष्ट आरोग्य अधिकार्यांना पुन्हा जिल्ह्यात आणले असल्याची टीका देखील श्री.उपरकर यांनी केली.