संजू परब यांचा इशारा; पालकमंत्री केसरकर यांच्यावर टिका…
सावंतवाडी ता .२५ : केसरी अलाठी धनगरवाडी येथील धनगर बांधवाची तब्बल अठरा घरे वीजेपासुन वंचित आहेत. पोल घालण्याची परवानगी मिळून सुध्दा केवळ स्थानिक पुढारी त्यात आडकाठी आणण्याचा प्रकार आहेत.त्यामुळे येत्या सात दिवसात हे काम सुरू करण्यात यावे अन्यथा प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.
पालकमंत्री दीपक केसरकर यांचे गाव वसलेले केसरी येथील धनगरवाडी मध्ये राहणाऱ्या लोकांना घर पत्रक उतारे देण्यात आले आहेत.परंतु त्यांना अद्याप पर्यंत वीज कनेक्शन देण्यात आलेले नाही.वीज कनेक्शन मंजूर आहे.परंतु पोल घालण्यासाठी काही लोक विरोध करत असल्यामुळे हे काम रेंगाळले आहे.वारंवार पाठपुरावा करून सुद्धा त्या लोकांना काही गाव पुढाऱ्यांकडून त्रास दिला जात आहे.
याबाबत आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आक्रमक भूमिका घेणार आहे येत्या आठवड्यात त्या लोकांची मागणी लक्षात घेऊन त्यांना तात्काळ वीज पुरवठा सुरू करून द्यावा अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे. ते पुढे म्हणाले पालकमंत्री दीपक केसरकर यांचे काही कार्यकर्ते या कामात आडकाठी आणण्याचा प्रयत्न करीत आहे .मात्र मागच्या वेळी झालेल्या बैठकीत त्या वस्तीला पाणी वीज व रस्ते या सेवा पुरवल्या जातील असे आश्वासन खुद्द केसरकर यांनी दिले होते. त्यांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला की काय असा प्रश्न श्री. परब यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, गुरु सावंत, धनगर बांधव धोंडीराम जंगले, चद्रकांत पाटील, तुकाराम जंगले, सिताराम जंगले, धोंडीराम पाटील, सिताराम जंगले आदी उपस्थित होते.