भाई मंत्री; प्रेरणा भूमीचा धम्म प्रकाश संध्या कार्यक्रम संपन्न…
सावंतवाडी,ता.०२: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी सर्व समाजावर समान प्रेम केले, त्यांच्या संविधानमुळेच देश प्रगतीपथावर आहे. बहुजन समाजाला प्रगतीची दारे सर्व क्षेत्रात आज खुली असल्याने डॉ.बाबासाहेबांचा आदर्श घेऊन समाजाने प्रगती करावी. या प्रगती नंतर घेण्याची नव्हे, तर देण्याची प्रवृत्तीही आत्मसात करावी, असे आवाहनात्मक प्रतिपादन जिल्ह्यातील नामवंत उद्योजक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रघुवीर उर्फ भाई मंत्री यांनी येथे केले.
समता प्रेरणा भूमी संवर्धन समितीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरमध्ये आयोजित केलेल्या धम्मप्रकाश संध्या या जिल्हास्तरीय बुद्ध भीम गीत गायन स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात रविवारी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सत्कार मूर्ती सिद्धार्थ तांबे, भावना कदम, रश्मी जाधव-चौकेकर, मंगेश कदम इ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दीपक पडेलकर होते. प्रारंभी भाई मंत्री यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व मान्यवर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्पर्धा प्रमुख अनंत कदम यांनी भीमगीत गाऊन स्वागत केले. तर संस्थेचे सचिव मोहन जाधव यांनी प्रास्ताविक केले. या नंतर उद्योजक भाई मंत्री यांचा संस्थेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व ग्रंथ भेट देऊन पडेलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तर भाई मंत्री यांच्या हस्ते कविवर्य सिद्धार्थ तांबे, शिक्षक समितीचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष समीर जाधव यांचाही शाल पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून श्री मंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी आयुष्य हे चांगले जगण्यासाठी असते पण समाजासाठी जगलात तर समाजही तुमची दखल घेतो याचे उदाहरण म्हणजे जाधव गुरुजी असल्याचे सांगून अशा गुणी कलावंतांचा सन्मान करा असे आवाहन त्यांनी करून अशा कार्यक्रमासाठी रोख २१ हजारांची देणगी ही त्यांनी जाहीर केली. अध्यक्षीय मनोगतात श्री पडेलकर यांनी अशा कार्यक्रमातून मनोरंजन नव्हे तर प्रबोधन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जाधव यांनी केले तर आभार शांताराम असनकर यांनी केले.
यावेळी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भिमगित गायन स्पर्धेत सुमारे २० स्पर्धकांनी भाग घेतला.
यावेळी प्रथम – ममता प्रभू (आजगाव) – यांना रोख ३०००रू. (रश्मी दीपक पडेलकर पुरस्कृत)
द्वितीय – योगेश जाधव( आंबोली) – रोख २००० रू.
(पुरस्कृत दत्ताराम जाधव)
तृतीय- संजय कदम( पियाळी) – रोख १०००रू
(पुरस्कृत विठ्ठल कदम)
उत्तेजनार्थ – स्वरा आचरेकर ( आचरा)- पुरस्कृत चंद्रशेखर जाधव, संदेश कुणकेरकर (कुणकेरी)
पुरस्कृत श्रद्धा असनकर.
शिवाय सर्व विजेत्यांना आकर्षक स्मृतिचिन्हे पुरस्कृत ममता मोहन जाधव व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुनील गोवेकर व राहुल कदम यांनी केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन स्नेहा कदम व अनंत कदम यांनी केले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संस्थेचे पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.



