बाळासाहेब दोलतडे : आंबोली येथे आयोजित कार्यक्रमात आवाहन
आंबोली, ता. २९ : धनगर समाजाने यशस्वी होण्यासाठी आता सत्ता संपादन करण्यासाठी प्रयत्न करावा राजकारण हा सर्वात मोठा उद्योग आहे असे प्रतिपादन उद्योजकता, कौशल्य विकास व शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोलतडे यांनी आज येथे केले. राष्ट्रीय समाज पक्ष सिंधुदुर्गच्यावतीने आंबोली येथील हॉटेल JRD येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाजातील युवकांसाठी उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर रासप महाराष्ट्र प्रदेशचे नेते अण्णासाहेब रूपनवर, कोकण प्रमुख भगवान ढेबे, उद्योजकता शिबीराचे प्रमुख मार्गदर्शक प्रदीप वेंगुर्लेकर, रासप जिल्हाध्यक्ष तथा इंडियन धनगर असोसिएशनचे किशोर वरक, तालुका पशुसंवर्धन अधिकारी श्री. ठाकूर, उद्योजक जय महाजन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी दोलतडे म्हणाले की, धनगर समाजाने शेळी पालन व दुग्ध व्यवसाय करत असताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. त्यासाठी महामंडळाच्या विविध योजना आहेत त्याचा लाभ समाजबांधवांनी घ्यावा. विद्यमान सरकारने धनगर समाजासाठी 10 लाख रुपयांपर्यंत बीन व्याजी कर्ज, जमीन विकत घेण्यासाठी अनुदान, त्याशिवाय समाजातील लोकांना मागेल त्याला शेळ्या मेंढ्या महामंडळाकडून दिल्या जातील. अन्य उद्योग करण्यासाठीही शासन मदत करण्यास तयार आहे. त्यामुळे तरूणांनी नोकरीच्या भरवशावर न रहाता उद्योग धंद्याकडे वळावे. उद्योगधंदा व राजकारणच हि दोनच क्षेत्र धनगर समाजास सत्तेवर आणू शकतात. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रात समाजातील युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य रासप व महामंडळाकडून केले जाईल.