निलेश राणे; आता वैरत्व नाही, दोघांचे संबंध अधिक घट्ट दिसतील…
सावंतवाडी,ता.१०: राजकारणात कोण कोणाचा कायम स्वरुपी वैरी नसतो. त्यामुळे राजन तेलींच्या संघटना कौशल्याचा फायदा घेवून येणार्या काळात सिंधुदुर्गात शिवसेना मजबूत केली जाईल. केसरकर आणि तेली यांचे संबंध यापुढे अधिक घट्ट झालेले दिसतील, असा विश्वास शिवसेनेचे युवा नेते तथा आमदार निलेश राणे यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान आगामी काळात होणार्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्ह्यात लवकरच येणार आहेत. या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्यावर आमचा भर आहे, असे त्यांनी सांगितले.
शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजन तेली यांचे आज शिवसैनिकांच्या माध्यमातून आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थांनी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर श्री. राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख निता कविटकर, अनारोजीन लोबो, राजेंद्र निंबाळकर, अशोक दळवी, नारायण राणे, दिनेश गावडे, बाबु कुडतरकर, प्रेमानंद देसाई, परिक्षीत मांजरेकर, झेवियर फर्नांडिस, क्लेटस फर्नांडिस, प्रशांत साटेलकर आदी पदाधिकारी उपस्थित होतेे.
ते पुढे म्हणाले की, तेली हे जिल्ह्यातील प्रशासनाची जाण असलेले आणि विकासकामाची तळमळ असलेले टॉप फाईव्ह मधले नेते आहेत. त्यामुळे त्यांचे नॉलेज आणि अनुभवाचा फायदा घेवून येणार्या काळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. येणार्या काळात पक्ष संघटना मजबूत करण्याकडे आमचा भर आहे. अनेक जण पक्षात येण्यास इच्छुक आहे. त्यांचे लवकरच पक्ष प्रवेश घेण्यात येणार आहेत. कोणावर जबरदस्ती केली जाणार नाही. परंतू जे कोणी आमच्याकडे येतील त्यांना निश्चितच मान-सन्मान दिला जाईल.
ते पुढे म्हणाले, तेली आणि माझे नाते हे गेले अनेक वर्षे कौटुंबिक राहीले आहे. तत्कालीन परिस्थितीत आपली राजकीय ओळख नसताना नारायण राणे यांनी त्यांच्यावर माझी जबाबदारी दिली. त्यांनी ही ती यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळे मी वयाच्या २८ व्या वर्षी खासदर होवू शकलो. आता सुध्दा येणार्या काळात त्यांची मदत निश्चितच घेण्यात येणार आहे. सावंतवाडी मतदार संघासह जिल्ह्यातील रोजगार आणि आरोग्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.