परशुराम उपरकर ; दर्जेदार रस्त्यांसाठी नागरिकांनीच सजग राहावे….
कणकवली, ता.०५ : विकास कामांसाठी राज्य शासनाने निधी दिलेला नाही. तरीही विविध कामांच्या निविदा काढल्या आहेत. निविदा निघाल्यानंतर भाजप, शिवसेनेची मंडळी रस्त्यांची भूमिपूजन करत आहेत. शासनाकडे निधी नसताना केवळ आगामी निवडणुका समोर ठेवून राजकीय पक्षाची मंडळीनी भूमिपूजनाचा सपाटा सुरू केला असल्याची टीका मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली.
येथील मनसे कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, मालवण तालुक्यातील तोंडवळी गावातील दर्जेदार रस्त्यासाठी जनतेने संघर्ष केला. त्यानंतर संबधित अधिकाऱ्यांनी डांबर कमी वापरल्याचे मान्य केले. याच धर्तीवर जिल्ह्यातील जनतेने आपल्या भागातील कामे दर्जेदार होण्यासाठी सजग राहाण्याची गरज आहे.
ते म्हणाले, रस्ता कामांसाठी शासनाकडून निधी येत नसल्याने निविदा निघाल्यातरी सर्व कामे पूर्ण होतील याची शाश्वती नाही. मागील वर्षी दोडामार्ग तालुक्यातील १० कोटींच्या कामावरून संघर्ष झाला होता. त्यावेळी स्थानिक आमदारांनी नवीन निविदा काढण्याचे जाहीर केले. मात्र अद्याप ती कामे झाली नाहीत. सध्या लोकप्रतिनिधी फक्त भूमिपूजन करताहेत. मात्र प्रत्यक्षात कामे होत नाहीत.
ते म्हणाले, मालवण मध्ये ५० कोटींच्या नळयोजनेबाबत घोषणा झाली. आमदार नाईक यांनी घोषणा केलेली मालवण पासून तारकर्ली, देवबाग वायरीची नळयोजना अद्याप सुरू झालेली नाही. शासनाकडे निधी नाही, त्यामुळे लोकप्रतिनिधी विकासकामांच्या केवळ सवंग घोषणा करून जनतेला फसवत आहेत.