संजय राऊत; बाहेरून आलेल्या लोकांनी शिवसेना आणि निष्ठेच्या गोष्टी सांगू नये…
मुंबई,ता.२८: शिवसेनेची निष्ठा सांगणाऱ्या बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी आता पहिले सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात निवडून यावे आणि त्यानंतर बोलावे, असा टोला खासदार तथा शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ते पक्षात आले. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या आणि निष्ठेच्या गोष्टी सांगू नयेत, असे त्यांनी सांगितले. काल दिपक केसरकर यांनी ट्विटरवर टाकलेल्या पत्राच्या माध्यमातून संजय राऊत, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यावर टीका केली होती. पक्षप्रमुख आणि बंडखोर आमदार यांच्यात भांडण लावण्याचे काम संजय राऊत करत आहेत. मात्र शिवसैनिकांवर आमचे आम्ही केलेला लढ्याला बंड म्हणता येणार नाही. आमचा लढा शिवसेनेचा आहे, असे विधान केले होते.
याबाबत त्यांना विचारले असता राऊत म्हणाले, केसरकरांना म्हणावं आधी सावंतवाडी मतदारसंघात निवडून या, नंतर काही त्या गोष्टी सांगा. त्यांना शिवसेना काय कळणार? असा टोला त्यांनी लगावला. ते मुंबई येथे पत्रकारांशी बोलत होते.