वैभव नाईकांची श्री.चव्हाण यांच्याकडे मागणी; मंत्र्यांकडून वागदेतील अपघातग्रस्त ठिकाणाची पाहणी…
कणकवली,ता.२७: महामार्ग चौपदरीकरणाच्या अपूर्ण कामामुळे महामार्गावर अनेक अपघात झाले. यात अनेकांना जीव गमवावा लागला. या मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली. महामार्ग पाहणी दौऱ्यावर असलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची आज श्री.नाईक यांनी वागदे येथे भेट घेतली. या भेटी वेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
दरम्यान मंत्री श्री.चव्हाण यांच्या राजापूर दौऱ्यावेळी शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी त्यांची भेट घेतली होती. तर सिंधुदुर्ग दौऱ्यात आमदार वैभव नाईक यांनी श्री.चव्हाण यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. दरम्यान श्री.नाईक यांनी श्री.चव्हाण यांच्याशी महामार्ग चौपदरीकरणातील कामे तातडीने पूर्ण व्हावीत. महामार्गावर अपघातात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी आदींबाबतही चर्चा केली. तर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांन महामार्गाची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा असे निर्देश महामार्ग प्राधिकरणच्या अभियंत्यांना दिले.