दिपक केसरकर; सावंतवाडीत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा…
सावंतवाडी,ता.०१: विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबांच प्रेम नातवंडांना मिळत नाही, त्यामुळे शाळांमध्ये “आजी-आजोबा दिन” साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे आधार असतात. या वटवृक्षाच्या छायेत समाज बहरत असतो, असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आज साजरा करण्यात आला. याप्रसंगी श्री.केसरकर बोलत होते.
यावेळी सामाजिक कार्यात ज्येष्ठ व गरजूंसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना ‘श्रावणबाळ’ पुरस्कारान गौरविण्यात आले. तर श्री. केसरकर यांचा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी एका चिमुकल्यांंने श्री. केसरकर यांना ग्रिटींग कार्ड भेट दिले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक अण्णा देसाई, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बळवंत मसुरकर, सचिव प्रकाश राऊळ, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर, बी.एन. तेली यांसह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
केसरकर पुढे म्हणाले,ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे खऱ्या अर्थाने आधार असतात. मी सावंतवाडीत सुद्धा डे कॅप सेंटर चालू केले होते. आणि ते तुम्ही चालवत आहात मात्र मला कामामुळे तेथे जाण्याची संधी मिळाली नाही. मात्र मी नक्कीच त्या सेंटरला भेट देईन, आणि वरच्या मजल्यावर आणखीन खोल्या काढून राहण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ खासकीलवाड्यामध्ये एक वृढाआश्रम चालू केलेले आहे.मी नगराध्यक्ष असताना ती इमारत बांधली गेली होती. त्या ठिकाणी चार-पाच कुटुंब तरी राहतात. मात्र त्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा आहेत की नाही याची खात्री करा, आणि सुविधा नसतील तर त्याची यादी माझ्याकडे द्या,मी नक्कीच त्या ठिकाणची गैरसोय दूर करेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.ज्येष्ठ नागरिकांच्या इमारती मी पालकमंत्री असताना मंजूर केल्या होत्या. मात्र ते अजून पर्यंत झाले नाही, मात्र आता मी पुढच्या काळात त्याचा पुन्हा पाठपुरावा करीन,आणि ते पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करीन.