संजय लाड; ग्रामस्थांच्या वतीने सावंतवाडी तहसीलदारांकडे निवेदनातून मागणी…
सावंतवाडी,ता.१९: माडखोल-धवडकी येथील नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याची मोहीम तात्काळ हाती घ्या, अशी मागणी माजी सरपंच संजय लाड यांनी तहसीलदार अरुण उंडे यांच्याकडे केली आहे. दरम्यान मे २०२२ मध्ये गाळ काढण्यासाठी कोणीही ठेकेदार मिळत नव्हता. त्यामुळे विलवडे येथील ग्रामस्थ मदन कांबळी यांनी शासनाकडे रीतसर रॉयल्टी भरून गाळ उपसा केला होता. त्याच पद्धतीने पुन्हा ही मोहीम राबविण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबतचे निवेदन श्री. लाड यांनी प्रसिद्धीस दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, माडखोल-धडकी नदीपात्रातील गाळ काढणे अत्यंत महत्त्वाचे असल्यामूळे मे अखेर शासन स्तरावर जेसीबी आणि पोकलॅन्ड तात्काळ पाठवून गाळ काढणेसाठी ग्रामस्थांना चांगले सहकार्य केले होते. तसेच सदर नदीपात्रातील गाळ मे २०२२ अखेरीस काढण्यासाठी कोणीही संस्था किंवा ठेकेदार मिळत नव्हता. अशा परिस्थितीत विलवडे येथील ग्रामस्थ मदन कृष्णा कांबळी यांच्याशी चर्चा करुन, त्यानंतर श्री. कांबळी यांनी शासनाकडे रितसर रॉयल्टी नरून भर पावसात नदीतील गाळ काढण्याचे देवदूताच्या रुपाने काम युद्ध पातळीवर सुरु केले. म्हणून जुलै २०२२ मध्ये अतिवृष्टीत पुराचा धोका थोड्याफार प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे माडखोल-धवडकी परिसरातील नदीपात्रातील उर्वरित गाळ काढणे सुद्धा आता अती महत्वाचे आहे. तरी श्री. मदन कृष्णा कांबळी याच्या कडून उर्वरित नदी पात्रातील गाळ काढून ग्रामस्थांना सहकार्य करावे, असे त्यांनी म्हटले आहे. या निवेदनात गोपाळ वर्दम, प्रसाद वर्दम, सुनील वर्दम, तातोबा धडाम, मंगेश डांगी आदींच्या स्वाक्षरी आहेत.