तात्काळ योग्य ती उपाययोजना करा; ग्रामपंचायत सदस्य राजाराम सावंत यांची मागणी…
बांदा,ता.०६: तिलारीच्या बांदा शाखा कालव्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याने ठिकठिकाणी निकृष्ट कामामुळे कालव्याचे पाणी लगतच्या घरांमध्ये शिरले आहे. बांद्यात याचे प्रमाण मोठे असून मलनिसारण टाक्यामध्ये पाणी शिरल्याने आरोग्याचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याची तात्काळ दखल घेत कालवा विभागाने त्यावर योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी बांदा ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी केली आहे.
महिन्याभरपूर्वी तिलारी कालव्यात नेतर्डे येथून पाणी सोडण्यात आले. सुरुवातीला पाण्याचा वेग हा कमी होता. मात्र कालव्याच्या ४२ किलोमीटर क्षेत्रात पाणी वेळेत न पोहोचल्याने तिलारी कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी गोवा शासनाशी चर्चा करत पाण्याच्या विसर्ग हा दुप्पट वेगाने वाढवीला. परिणामी कालव्याला ठिकठिकाणी गळती लागल्याने पाणी झिरपण्यास सुरुवात झाली. याचा सर्वाधिक परिणाम हा बांदा शहरात जाणवला. अनेक घरांमध्ये कालव्याचे पाणी शिरले. शहरातील ग्रामपंचायत नजीकचा ओहोळ देखील प्रवाहित झाला आहे. मलनिसारण टाकीत देखील कालव्याचे पाणी शिरल्याने यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लवकरात लवकर यावर उपाययोजना करणे गरजेचे असून तिलारी कालवा विभागाने याची वेळीच दखल घ्यावी.