ग्रामस्थ आक्रमक; सावंतवाडीतील वीज अधिकाऱ्यांना दिला इशारा…
सावंतवाडी,ता.१६: पावसाळ्याच्या तोंडावर माडखोल गावात वायरमन नसल्यामुळे अनेक समस्यांना ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे दोन दिवसात वायरमन नेमा अन्यथा सावंतवाडीतील वीज कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा आज येथील ग्रामस्थांच्या वतीने वीज अधिकाऱ्यांना देण्यात आला. दरम्यान याबाबत दोन दिवसात सकारात्मक भूमिका घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. माजी सरपंच राजन राऊळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
येथे कार्यरत असलेले वायरमन श्री. कुलकर्णी यांची बढती झाली आहे. त्यामुळे गावात गेले चार महिन्यांपासून वायरमनची जागा रिक्त आहे. वीज वितरण कंपनीचा अनेकदा लक्ष वेधून देखील दुर्लक्ष कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज सावंतवाडीतील वीज वितरणचे कनिष्ठ अभियंता पी. डी. चव्हाण व धनंजय मिसाळ यांना जाब विचारला. यावेळी दोन दिवसात नवीन वायरमन ची नियुक्ती करून देऊ, असे आश्वासन दिले. यावेळी राजन राऊळ, संजय राऊळ, आशिष नाईक, सुयोग राऊळ उपस्थित होते.