प्रशासनाच्या विरोधात नाराजी; अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे…
सावंतवाडी,ता.०५: येथील बसस्थानकातील प्रश्नांकडे वारंवार लक्ष वेधून सुध्दा प्रशासन ढिम्म असल्याने माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व त्यांच्या सहकार्यांनी आज एसटीच्या अधिकार्यांना घेराव घातला. जो पर्यंत वरिष्ठ अधिकारी येवून लेखी उत्तर देत नाहीत तो पर्यंत माघार घेणार नाही, असे सांगून त्या ठिकाणी ठिय्या मांडला. अखेर त्या ठिकाणी दाखल झालेल्या अधिकार्यांनी येत्या दहा दिवसात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी पत्र वजा आश्वासन दिल्यानंतर सर्वांनी माघार घेतली. वेळेत लोकांच्या मागण्या पुर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.सावंतवाडी बसस्थानकात अनेक प्रश्न आहे. त्या ठिकाणी खड्डे असल्यामुळे चिखलाचे साम्राज्य आहे. तसेच प्रवाशांचे विविध प्रश्न आहेत. याबाबत वारंवार लक्ष वेधून सुध्दा संबंधित अधिकारी त्याकडे दूर्लक्ष करीत होते. त्यामुळे त्यांच्याबाबत नाराजी होती.दरम्यान आज पुन्हा त्या ठिकाणी जाब विचारण्यासाठी श्री. साळगावकर व त्यांचे सहकारी गेले. यावेळी प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, सुधीर पराडकर, शिवाजी चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, बंड्या तोरसकर, उमेश खटावकर, रवी जाधव, संदिप नाईक, प्रदिप नाईक, प्रदीप ढोेरे, दत्तप्रसाद गोठोसकर आदी उपस्थित होते.यावेळी त्या ठिकाणी आलेल्या विभाग नियंत्रकांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान तात्काळ या समस्या सोडविण्यात न आल्यास पुन्हा यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी साळगावकर यांनी दिला.