बबन साळगावकर; चौकशी करा,पोलीस अधीक्षकांकडे मागणी
सावंतवाडी ता.०२: आंबोली घाटात मृतदेह टाकण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. सिंधुदुर्ग पोलीस नेमके करता हेत काय? त्या ठिकाणी असलेली चेकपोस्ट फक्त मलिदा खाण्यासाठीच आहेत का? असा सवाल सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे. दरम्यान या ठिकाणावरून नेण्यात आलेला गोव्यातील युवतीचा मृतदेह कसा नेला? त्यावेळी कोण पोलीस कर्मचारी ड्युटी बजावत होते ?याची पोलीस अधीक्षकांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
आंबोली घाटात दिवसेंदिवस मृतदेह आणून टाकण्यात आल्यामुळे आंबोली पर्यटन स्थळ बदनाम होत आहे. त्यामुळे याबाबत पोलिसांनी आता आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे. या ठिकाणी आंबोली जाताना तीन चेक पोस्ट उभारण्यात आली आहे. परंतु तरीही असे प्रकार नेमके का होतात ? याचा पोलिसांनी शोध घेणे गरजेचे आहे. असे साळगावकर यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले असून पोलिसांच्या भूमिकेवर जोरदार नाराजी व्यक्त केली आहे.