दीपक केसरकर; महिलांना सबसिडीचे कर्ज, गाईडचा खर्च रत्नसिंधू योजनेतून…
सावंतवाडी,ता.२०: पारपोली येथे होणारे फुलपाखरू पर्यटन मर्यादीत कालावधीसाठी न राहता कायम कसे राहील यासाठी येणार्या पर्यटकांना कशा सुविधा दिल्या जातील त्या माध्यमातून कसा रोजगार निर्माण होईल हा उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून गावचा आणि पर्यायाने आपला विकास करा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पारपोली ग्रामस्थांना केले. दरम्यान ज्या ठिकाणी वाद आहेत त्या ठिकाणी पर्यटक येत नाहीत त्यामुळे नाहक वाद थांबवा आणि विकासाला महत्व द्या सर्वांनी एकत्र येवून गावचा विकास करा भविष्यात गावात “हेल्थ स्पा” आणण्याचा माझा मानस आहे. यासाठी स्थानिक तरुणांना गाईड म्हणून प्रशिक्षण देवू तसेच महिलांना कर्ज पुरवठा देवून त्यात ३० टक्के सबसिडी देवू आणि व्याजाची रक्कम रत्नसिंधू योजनेतून अदा केली जाईल, असे आश्वासन केसरकर यांनी दिले.
वनविभागाच्या माध्यमातून पारपोली येथे आयोजित करण्यात आलेल्या फुलपाखरांच्या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी किशोर तावडे, उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, माजी आमदार राजन तेली, सरपंच कृष्णा नाईक, उपसरपंच संदेश गुरव आदी उपस्थित होते. यावेळी श्री. केसरकर म्हणाले, जसे मधाचे गाव, पुस्तकाचे गाव, कवितेचे गाव तसेच पारपोली हे फुलपाखरांचे गाव म्हणून शासनाकडुन घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी येणार्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढणार आहे. त्यामुळे गावाचा विकास करण्याबरोबर या ठिकाणी रोजगार मिळण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्य करावा बेड अॅण्ड ब्रेकफास्ट सारखी स्कीम राबवून ग्रामीण घरात पर्यटक राहतील यासाठी प्रयत्न केले जावेत. गावाच्या बाजूला आंबोली सारखे पर्यटन स्थळ आहे. तेथे वाहणारे धबधबे आहेत. त्यामुळे या सर्वाचा फायदा घेवून गावाचा विकास कसा होईल या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.