भाजप युतीच्या कामांवर स्टिकर, बॅनर लावण्याचा वैभव नाईकांचा नवा फंडा..

12
2
Google search engine
Google search engine

धोंडी चिंदरकर ; २०२४ मध्ये डिपॉझिट जप्त करण्यास कार्यकर्ते सज्ज…

मालवण, ता. ३१ : भाजप युती राज्य शासनाच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचे श्रेय आपले सांगत विकास कामांचे नारळ फोडायचे. बॅनर, स्टिकर लावून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आमदार वैभव नाईक आणि ठाकरे गट करत आहे. त्यांनी हा नवीन फंडा काढला आहे. यात बॅनरबाजी करण्यासाठी कोल्हापूर येथे होलसेल मार्केटमध्ये त्यांनी बॅनर छपाई सुरु केली आहे. मात्र त्यांचे फसवणूकीचे धंदे २०२४ विधानसभा निवडणुकीत बंद होणार. आमदार नाईक यांचे डिपॉझिट जप्त करून त्यांच्या पराभवासाठी भाजप कार्यकर्ते व कुडाळ मालवणची जनता सज्ज आहे असे भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मालवण कुडाळ मतदारसंघात भाजप नेते निलेश राणे यांनी विशेष लक्ष दिले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या माध्यमातून मोठा निधी खेचून आणला आहे. विकास निधीची ही गंगा अशीच वाहत राहणार आहे. २०२४ मध्ये निलेश राणे यांचा विजय निश्चित असल्याचेही चिंदरकर, केनवडेकर यांनी सांगितले.
येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आप्पा लुडबे, युवामोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, नांदोस उपसरपंच विजय निकम, नंदू देसाई यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. केनवडेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जनहिताच्या योजना आणल्या. मालवणात १० हजार लाभार्थी शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला ५० कोटी, उज्वला गॅस, आनंदाचा शिधा, आयुषमान भारत हजारो लाभार्थी, फेरीवाल्यांसाठी १० हजार कर्ज, मत्स्य संपदा योजनेतून ई बाईक, इन्सुलेटेड व्हॅन, यांत्रिकीकरण बोट साठी अनुदान, १४ वित्त आयोग थेट लाभ, विमा, जलजिवन मिशन मधून १०० कोटी पेक्षा जास्त पैसा यातील ठाकरे गटाच्या काही ग्रामपंचायतीमध्येही कोट्यवधी रुपयांची कामे सूरू आहेत तसेच महिलांना एसटी तिकीट सवलत, कोरोना काळात मोफत लस हे सर्व पंतप्रधान मोदी यांनी केले त्याचे श्रेय आम्ही घेणारच. रस्ता व अन्य विकासासाठी पैसे उपलब्ध करून दिले. त्यामुळे जे पंतप्रधान यांनी केले ते भाजप अर्थात मोदी यांनी केले असेच आम्ही म्हणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्ष आयुष्यमान भारत शिबिर घेतात ते चालते का? तेव्हा ठाकरे गट पदाधिकारी या योजनेचा लाभ घेतात. वादळात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जास्त लाभ घेतला. चांदा ते बांदा योजनेचाही ठाकरे गटाने जास्त लाभ घेतला. सर्वसामान्य जनता व विरोधकांना न्याय दिला नाही. विरोधी पक्षाला निधी दिला नाही हे ठाकरे गटाने सत्तेत असताना राजकारण केले. त्यामुळे आता त्यांनी बोंबा मारू नये. पंतप्रधान मोदी यांच्या कामाचे श्रेय त्यांनाच मिळाले पाहिजे असे श्री. केनवडेकर म्हणाले.
हिंदू हृदय सम्राट हा बाळासाहेबांचा अभिमान भाजपने नेहमी जपला. मात्र उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व विरोधात काम केले. आमचा बाळासाहेब यांच्या बद्दल आदर आहे. राम मंदिर श्रेय रामभक्त, हिंदू आणि भाजप यांचे आहे. मोदी सरकार मुळेच राममंदिर झाले. हे वास्तव आहे. मात्र आम्हाला त्याचे राजकारण करायचे नाही. जे खरे आहे ते खरेच असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाकरे सरकार काळात भाजप कार्यकर्त्यांवर जन आशीर्वाद व अन्य कार्यक्रमात अनेक खोट्या केसेस टाकल्या गेल्या असे असताना आता कुडाळ मध्ये सरकारी कार्यक्रमात अडथळा आणल्यामुळे प्रशासनाच्या तक्रारीमुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले म्हणून त्यांनी बोंबा मारू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना चुकीच्या पद्धतीने निधी मंजूर केला. त्याला स्थगिती मिळाली. या विरोधात ८४ आमदार न्यायालयात गेले. त्यावरील काही स्थगिती उठली. मात्र चुकीच्या कामावरील स्थगिती उठणार नाही कारण जे चुकीचे ते चुकीचेच आहे.
श्री. चिंदरकर म्हणाले, ठाकरे गटाला स्मृतीभंश झाला आहे. भाजप युती सरकार मधील राज्य शासन, पालकमंत्री स्तरावर मंजूर झालेली सर्व कामे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार फंडातून झालेली कामे आमदार वैभव नाईक आपले म्हणत आहेत. आता खोटी पत्र देण्याचे थांबवून त्यांनी प्रत्येक काम आपले सांगण्याचा नवीन फंडा सुरु केला आहे. मात्र जनता पूर्ण ओळखून आहे. या मतदारसंघात भाजप नेते निलेश राणे यांनी विशेष लक्ष दिले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शन खाली शासनाच्या माध्यमातून मोठा निधी खेचून आणला आहे. विकास निधीची ही गंगा अशीच वाहत राहणार आहे. २०२४ ला निलेश राणे यांचा विजय निश्चित असून वैभव नाईक यांचे डिपॉझिट जप्त होईल.