भाजपच्या स्वयंघोषित पुढाऱ्यांनी बजेटचा अभ्यास करावा नंतरच टीका करावी…

32
2
Google search engine
Google search engine

वैभव नाईक ; कामांचा पाठपुरावा, निधी आणल्याने श्रेय घेणारच…

मालवण, ता. ०३ : कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघासाठी न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाकडून स्थगिती दिलेल्या कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे ज्या कामांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निधी उपलब्ध करून दिला होता तीच कामे सध्या माझ्या मतदार संघात सुरू आहेत. यामुळे ज्या कामांसाठी आम्ही प्रयत्न केले आणि निधी उपलब्ध करून घेतला त्या कामांचे श्रेय आम्ही घेणारच. सत्ता बदलल्यानंतर झालेल्या चार बजेटमध्ये एकही रूपयांचा निधी या मतदार संघाला रस्त्यांच्या कामासाठी दिलेला नाही. यामुळे भाजपच्या स्वयंघोषित पुढाऱ्यांनी आधी बजेटचा अभ्यास करावा आणि नंतरच ठाकरे शिवसेनेवर टिका करावी असा टोला आमदार वैभव नाईक यांनी येथे पत्रकार परिषदेत लगावला.
ठाकरे शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, सिद्धेश मांजरेकर, उमेश मांजरेकर, लारा देसाई, सन्मेश परब, अनंत पाटकर, दत्ता पोईपकर, मनोज मोंडकर, नरेश हुले तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी श्री. नाईक यांनी बजेटची पुस्तकेच सादर केली. यामध्ये एकतरी रूपयांचा निधी रस्त्यांसाठी आपल्या मतदार संघाला दिला नसल्याचे निदर्शनास आणून दिले. सत्ताधारी पक्षाकडून या मतदार संघावर थेटपणे अन्याय करण्यात येत आहे. फक्त सावंतवाडी आणि कणकवली मतदार संघासाठी निधी दिला आहे. येथील भाजपच्या नेत्यांनी अगोदर निधी आणावा आणि नंतरच भुमीपूजने व उद्घाटने करावीत असा टोला श्री. नाईक यांनी लगावला.
ते म्हणाले, आचरा येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाची वर्कऑर्डर अद्याप झाली नसताना निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्र्यांनी रस्त्याचे भुमीपूजन करणे दुदैवी आहे. पंतप्रधान ग्रामसडक आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तब्बल ३० कामांना गेले आठ महिने वर्कऑर्डर दिलेली नाही. या खात्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या टक्केवारीच्या वादात या कामांची वर्कऑर्डर अडकून पडली आहे. यामुळे आपण गुरुवारी मंत्रालयात जावून या योजनेचे सचिव यांची भेट घेवून कामांच्या वर्कऑर्डर बाबत चर्चा करणार असल्याचेही श्री. नाईक यांनी स्पष्ट केले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी श्रेयासाठी भुमीपूजन करणे आपण समजू शकतो मात्र पालकमंत्र्यांनाही अशाप्रकारे वर्कऑर्डर नसलेल्या रस्त्याचे भुमीपुजन करण्यासाठी जावे लागत असेल तर ते दुदैवी आहे.
आम्हाला बॅनर आणि स्टीकर लावण्याची गरज नाही. कुडाळ मालवण मतदार संघातील जनतेला कोण काम करतो आणि कोण श्रेयासाठी धावतो याची माहिती आहे. आम्ही निधी आणला आणि निधीसाठी न्यायालयाचे दरवाजे थोटावले. शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून मतदार संघातील प्रत्येक गावात कामे होण्यासाठी आमची धडपड असते यासाठी जिल्हा नियोजनमधून मिळणारा निधी आणि शासनाकडून देण्यात येणारा निधी यातून आम्ही कामे करत असतो. आवश्यक असणारे सर्व रस्ते पूर्ण करण्यासाठी आमची तळमळ आहे. यामुळे आमच्यावर टिका करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी आधी निधी आणावा आणि नंतरच आमच्यावर टिका करावी. जिल्हा नियोजनचे सदस्य नसणारेही आपण पालकमंत्री असल्याप्रमाणे निधी आणल्याची भाषा करत आहेत. यातून जनता आणि कार्यकर्ते समजायचे ते समजून जातात असे श्री. नाईक यांनी सांगितले.
पाणबुडी प्रकल्प तत्कालीन पर्यटन मंत्र्यांमुळे रखडल्याचे मंत्री उदय सामंत आणि दिपक केसरकर हे सांगत असतील तर गेली दोन वर्षे हा प्रकल्प होण्यासाठी तुम्ही काय केलात? असा प्रश्न श्री. नाईक यांनी उपस्थित केला. पाणबुडी प्रकल्प गुजारातमध्ये होण्यासाठी राज्याच्या पर्यटन मंत्र्यांनीच माहिती गुजरात सरकारला दिली. यामुळे तो त्याठिकाणी होत असेल तर बजेटमध्ये घोषणा करणाऱ्या केसरकर यांनी काय केले? हेही जाहीर करावे. दोन मंत्री सिंधुदुर्गात बोलतात तर पालकमंत्री मुंबईत बैठक घेतात यातून या तिन्ही मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. जर मंत्रीच एकत्रित नसतील तर प्रकल्पाचे काय होणार? हे सिंधुदुर्गची जनता पाहिल असेही श्री. नाईक यांनी सांगितले. सी-वर्ल्ड प्रकल्पाला आमचा विरोध नव्हता आणि आजही नाही मात्र सी-वर्ल्डच्या नावाखाली ग्रामस्थांच्या जमिनी हडप करण्याचा खेळलेला डाव आम्ही हाणून पाडला. यामुळे कमी जागेत प्रकल्प करण्यास आमचा पाठिंबा असेल असेही श्री. नाईक यांनी स्पष्ट केले.