सावंतवाडी महसूलकडे मागणी ; राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली तहसीलदारांची भेट…
सावंतवाडी,ता.०९: अवकाळी पावसाने कोकणातील आंबा आणि काजू बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे यांनी सावंतवाडी तहसीलदारांकडे केली आहे. काल रात्री उशिरा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळला. त्याचा फटका काजू व आंबा बागायतीवर होणार आहे. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सौ. घारे यांनी श्रीधर पाटील यांची भेट घेतली. यावेळी प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे आश्वासन श्री. पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले.
याप्रसंगी जिल्हा महिला अध्यक्ष रेवती राणे, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, युवती अध्यक्षा सुधा सावंत, अल्पसंख्याक अध्यक्ष मारीता फर्नाडिस, काशिनाथ दुभाषी, झहूर खान, पूजा दळवी, उल्हास सावंत, गंगाराम परब, योगेश साळगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.