करूळ घाटाच्या पायथ्यापर्यंत तात्काळ बस सेवा सुरू करा…

69
2
Google search engine
Google search engine

ग्रामस्थांची मागणी; एसटी अधिकाऱ्यांचे वेधले लक्ष…

वैभववाडी,ता.२४: करूळ घाट वाहतुकीस पूर्णतः बंद असल्याकारणाने वैभववाडी ते करुळ घाट पायथ्यापर्यंत तात्काळ एसटी सेवा सुरू करा, अशी मागणी करूळ ग्रामस्थ व प्रवाशांच्या वतीने वाहतूक नियंत्रक भागोजी गुरुखे यांच्याकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन श्री. गुरखे यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, तळेरे गगनबावडा या मार्गाचे काम सद्यस्थितीत युद्धपातळीवर चालू आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने करुळ घाट महामार्गावरील वाहतूक भुईबावडा व फोंडा घाट मार्गे वळविण्यात आली आहे, व करूळ घाट वाहतुकीला पूर्णतः बंद करण्यात आला आहे. त्यामुळे एसटी फेऱ्या बंद झाल्याने येथील शाळा, कॉलेज तसेच कामासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे करूळ घाट पायथ्यापर्यंत दिवसातून तीन गाड्या सोडण्यात याव्यात असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी करूळ सरपंच नरेंद्र कोलते, तंटामुक्ती अध्यक्ष बबन सावंत, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र पवार, सामाजिक कार्यकर्ते अनंत कदम, ग्रामपंचायत सदस्य रेखा सरफरे, सदस्य माधवी राऊत, रवींद्र सरफरे, राजू कदम, दिलीप कदम, दीपक लाड, उदय सावंत, जगन्नाथ चव्हाण, जितेंद्र गुजर‌ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.