सुशांत नाईक ; लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जनता जागा दाखवेल…
कणकवली,ता.०६: शिवसेना पक्षप्रमुखांच्या सभा, दौरा याला उत्स्फुर्त पाठिंबा मिळाला. जिल्ह्यात भगवे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांना तातडीने मुंबईहून सिंधुदुर्गात यावे लागले. एवढेच नव्हे तर ठाकरेंच्या सभेनंतर त्यांना मुद्दे सोडून बोलावे लागले. प्रचंड आकांडतांडव करावा लागला. याचाच अर्थ ठाकरेंचा सिंधुदुर्ग दौरा पूर्णपणे यशस्वी झाला आहे. आता शिवसेनेची घौडदौड कुणीही रोखू शकत नाही. येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राणेंना जनताच जागा दाखवेल असा विश्वास युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज व्यक्त केला.
येथील विजयभवन मध्ये श्री.नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यात राणे बंधूंनी केलेल्या टीकेचा समाचार त्यांनी घेतला. यावेळी तेजस राणे, उत्तम लोके आदी युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.नाईक म्हणाले, अवघ्या चोवीस तासाच्या नियोजनात कणकवलीत उद्धव ठाकरे यांची सभा होते. या सभेला पाच हजारा पेक्षा अधिक जनता उपस्थित राहते. तर पक्षविरहीत असलेल्या निर्भय बनो सभेला देखील चार हजार लोक एकत्र येतात. याचा अर्थ भाजप आणि राणे यांच्या विरोधात अंडरकरंट आहे. राणेंचा जनाधार शिल्लक राहिलेला नाही.
नाईक म्हणाले, राणेंनी आता शिवसैनिकांना आव्हाने देण्याची भाषा बोलू नये. कारण राणेंची दहशत शिवसैनिकांनीच मोडून काढली आहे. खुद्द नारायण राणेंचा पराभव झाला. त्याचवेळी राणेंचे सिंधुदुर्गातील आव्हान संपुष्टात आलेले आहे. आता तर राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आंदोलने करून केसेस घेण्याची हिंमत राहिलेली नाही. त्यामुळे राणेंनी कितीही आदेश दिले तरी त्यांचे कार्यकर्ते शांतच राहणार आहेत.