उदय सामंताचे स्पष्टीकरण; किरण सामंत यांच्या बद्दल सुरू असलेल्या चर्चेला “फुलस्टॉप”…
सावंतवाडी,ता.०३: सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघावर आज ही आमचा दावा आहे. फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्रास होवू नये म्हणून भावनेच्या भरात इच्छुक असलेले उमेदवार किरण सामंत यांनी ती पोस्ट केली होती, असे स्पष्टीकरण शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी दिले आहे. दरम्यान हा मतदार संघ शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. त्या ठिकाणी किरण सामंत यांना संधी दिल्यास तब्बल दोन ते अडीच लाखाच्या मताधिक्याने ते निवडून येवू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकसभेची जागा भाजपाच लढविणार आहे. त्यामुळे कोणी यात लुडबूड करू नये, असे भाजपा नेते नारायण राणे यांनी ठणकावुन सांगितले होते. या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा सामंत यांनी आपल्या व्टिटर अकाउंटवर आपण माघार घेत असल्याची पोस्ट केली. परंतू काही वेळात त्यांनी ती डिलीट केली. त्यामुळे त्यांनी निवडणूकीतून माघार घेतली या चर्चेला उधाण आहे.
दरम्यान त्यानंतर याबाबतचे स्पष्टीकरण शिंदे गटाचे नेते सामंत यांनी केले. ते म्हणाले, या ठिकाणी आमचा लोकसभा मतदार संघावर कायम दावा आहे. आम्ही आज ही आग्रही आहोत. मात्र आपल्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्रास होवू नये म्हणून किरण सामंत यांनी भावनिक पोस्ट केली. त्याला माघार घेतली, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. आज ही आम्ही संधी मिळाल्यास आग्रही आहोत आणि उमेदवारी मिळाल्यास दोन ते अडीज लाखाच्या मताधिक्याने निवडून येवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.