परिमल नाईक; काही झाले तरी जनता नारायण राणेच्यांच पाठिशी राहणार…
सावंतवाडी,ता.२२: “निर्भय बनो” या बॅनरखाली सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेली विश्वंभर चौधरी व असिम सरोदे यांची सभा ही मातोश्रीचे सुपारी वजा वकीलपत्र घेऊन करण्यात आली होती. मात्र त्याचा कोणताही उपयोग या ठिकाणी होणार नाही, असा आरोप सावंतवाडीचे माजी नगरसेवक अँड. परिमल नाईक यांनी केला. दरम्यान राणेंवर टीका करण्या एवढे अॅड. सरोदे यांचे वय नाही. त्यामुळे त्यांनी किती ही बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला तरी येथील जनता राणे यांच्या समवेतच राहणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
काल या ठिकाणी झालेल्या निर्भय बनो सभेत राणे व मोदींवर टीका करण्यात आली. या पार्श्वभूमीवर श्री. नाईक यांनी आपली प्रतिक्रिया प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, या ठिकाणी उपस्थित व्यक्तीनी ही विचारांची सभा म्हणून उच्चार केला. परंतु त्या ठिकाणी विचारावर चर्चा न करता फक्त नरेंद्र मोदी आणि नारायण राणे यांच्यावर टीका करण्याचे कार्यक्रम करण्यात आला. सरोदे हे वैफल्यग्रस्त झाले असून त्यांनी आमदार अपात्रतेच्या चौकशीच्या वेळी वकील म्हणून काम केले. परंतु त्यांना पराभव पत्करावा लागल्यामुळे ते अद्यापही पराभव विसरले नाहीत. त्यामुळे ही बेताल वक्तव्य करत आहेत. परंतु काही वकील लोक सुपार्या घेऊन काम करतात. याचे मला मनस्वी दुःख वाटते, असे श्री. नाईक यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.