बांद्यात वाहतूक कोंडी रोखण्यासाठी योग्य ती उपाययोजना करा…

116
2
Google search engine
Google search engine

ग्रामस्थांची मागणी; सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडे निवेदन सादर…

बांदा,ता.१३: येथील उड्डाणपुलाच्या परिसरात सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक खोंळबण्याचे प्रकार वाढत आहे. त्यामुळे वाहन चालकांसह ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे योग्य ती उपाययोजना राबवा, अशी मागणी बांदा ग्रामस्थांच्या माध्यमातून सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्याकडे केली आहे. त्या ठिकाणी काम करत असलेला ठेकेदार चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत. मनमानी करून एकमार्गी वाहतूक वळवत आहेत. परिणामी अपघात होत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत ग्रामस्थांच्या माध्यमातून श्री. बडवे यांना निवेदन देण्यात आले आहे.

बांदा येथे महामार्गावर चालू असलेल्या नियोजित उड्डाणपुलाच्या कामाच्या ठिकाणी कंत्राटदाराकडून बेजबाबदार पणे व नियमबाह्य पद्धतीने वाहतूक एकमार्गी वळवण्यात येत आहे. ज्यामुळे मागील आठवडाभर महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या तसेच स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. मागील आठवड्याभरात या ठिकाणी रोज अपघात होत असून ॲम्बुलन्स सारख्या अत्यावश्यक सेवा देखील त्यामुळे प्रभावित होत आहे. या सर्व त्रासाला कंटाळत बांदा येथील स्थानिक ग्रामस्थ यांनी महामार्ग वाहतूक नियंत्रण कक्ष, मुंबई त्याचप्रमाणे महामार्ग वाहतूक नियंत्रक, सिंधुदुर्ग विभाग यांचेकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत या विभागाकडून दोन वाहतूक नियंत्रकांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु वाहतूक नियंत्रकांच्या कामकाजाची वेळ संपल्यानंतर या ठिकाणी पुन्हा प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू लागली. याकरता पुन्हा एकदा बांदा ग्रामस्थ एकत्र येत बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. बडवे यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले व महामार्ग वाहतूक नियंत्रण कक्ष व जिल्हा वाहतूक नियंत्रक यांच्याशी समन्वय राखत याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली.

यावेळी ग्रामस्थ प्रतिनिधी म्हणून गुरु कल्याणकर, हेमंत दाभोलकर, प्रशांत बांदेकर, सिद्धेश महाजन, आबा धारगळकर, रूपाली शिरसाट, मनोज कल्याणकर, शैलेश केसरकर, उदय येडवे, स्मिता पेडणेकर, साई सावंत व आशिष कल्याणकर आदी उपस्थित होते.