विलास जाधव आक्रमक; आश्वासन मिळेपर्यंत माघार नाही, पालिकेला इशारा…
सावंतवाडी,ता.१६: येथील माजी नगरसेवक विलास जाधव यांनी आज पाण्यासाठी थेट उंच असलेल्या सावंतवाडी पालिकेच्या नळपाणी योजनेच्या पाण्याच्या टाकीवर बसून अनोखे आंदोलन केले. जोपर्यंत पाणीपुरवठा नियमित होत नाही, तो पर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा त्यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.
गेले अनेक दिवस येथील समाज मंदिर परिसरात पालिका प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या पाण्याचा पुरवठा अनियमितपणे सुरू आहे. वारंवार याकडे पालिका प्रशासन व कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधून सुद्धा लक्ष दिले जात नाही, त्यामुळे संतापलेल्या श्री. जाधव यांनी आज अनोखी शक्कल काढत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी थेट समाज मंदिर परिसरात असलेल्या उंच टाकीवर चढून आपले आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण गेले महिनाभर लोकांच्या तक्रारींमुळे हैराण झालो. त्यांच्या म्हणण्यानुसार समाजमंदीर, मोरडोंगरी, गरड परिसरात पाणीच येत नाही, त्यामुळे आपण याबाबतची तक्रार पालिका प्रशासनाकडे केली होती, मात्र त्याकडे योग्य लक्ष देण्यात आला नाही त्यामुळे आपण ज्या ठिकाणी आज येऊन थेट टाकीवर चढून बसलो. यावेळी पाहिले असता १ लाख हजार क्षमता असलेल्या टाकीत १० हजार लिटर सुद्धा पाणी भरलेले नाही, त्यामुळे लोकांना पाणी मिळणार कसे? अशी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.