विद्युत खांब कोसळल्याने उंबर्डे-राज्यमार्गांवरील वाहतूक रखडली…
वैभववाडी,ता.१६: तालुक्याला आज वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कुसूर-बाजारवाडी येथे रस्त्यावर विद्युत खांब कोसळून पडला होता, त्यामुळे सुमारे अर्धा तास वैभववाडी उंबर्डे-राज्यमार्गांवरील वाहतूक रखडली होती. मात्र पाऊस ओसरल्यानंतर वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून विद्युत खांब बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
गेले काही दिवस तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार वादळी पाऊस सुरु झाला. या पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उमळून पडली. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. तर कुसूर बाजारवाडी येथे विदयुत खांब रस्त्यावर पडल्यामुळे सुमारे आर्धा तास वैभववाडी उंबर्डे मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनाच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वीज खांब बाजूला करून वाहतूक सुरु केली.
तर वैभववाडी शहरातील विजेचा ट्रान्सफॉर्मर झाल्यामुळे शहरातील वीज पुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत खंडित झाला होता. त्याच प्रमाणे आखवणे पुनर्वसन येथे झालेल्या वादळाने झाड पडल्यामुळे विद्युत खांब वाकल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच पुनर्वसन गावाठाणातील राजेंद्र मोरे, विश्वनाथ नागप, सुनील पडिलकर, रघुनाथ नागप, बयाजी जिनगारे, शिवाजी जिनगरे यांची काजुची झाडे वादळाने उमळून पडल्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.